ताज्या घडामोडीपिंपरी

‘विसंवाद हे कौटुंबिक र्‍हासाचे कारण!’ – ॲड. अनिशा फणसळकर

Spread the love

जिजाऊ व्याख्यानमाला – प्रथम पुष्प

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘वेगवेगळ्या प्रकारचे विसंवाद हे कौटुंबिक र्‍हासाचे कारण आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञ ॲड. अनिशा फणसळकर यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे बुधवार, दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘कुटुंबव्यवस्थेच्या र्‍हासाची कारणे आणि उपाय, पण याला जबाबदार कोण?’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना ॲड. अनिशा फणसळकर बोलत होत्या. पिंपरी – चिंचवड महापालिका सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, माजी नगरसेवक सुरेश भोईर, साहित्यिक श्रीकांत चौगुले, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, उपाध्यक्ष ॲड. विपुल नेवाळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजीमहाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. चंद्रकांत इंदलकर यांनी, ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, ही म्हण खरी आहे. प्रशासकीय सेवेत मी त्याचा अनेकदा अनुभव घेतला आहे. गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या प्रारंभीच्या काळात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या उपक्रमांशी जोडलो गेलो होतो!’ अशी भावना व्यक्त केली. राजाभाऊ गोलांडे यांनी प्रास्ताविकातून, ‘जिजाऊ व्याख्यानमालेच्या माध्यमातून चौतीस वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या विषयांवर समाजप्रबोधन केले आहे; तर अत्याधुनिक व्यायामशाळेमुळे असंख्य तरुणांचे बलसंवर्धन घडले आहे!’ अशी माहिती दिली.

ॲड. अनिशा फणसळकर पुढे म्हणाल्या की, ‘एकत्र कुटुंबव्यवस्था ही आपली संस्कृती आता लोप पावत चालली आहे; तसेच छोट्या कुटुंबातही कलह आणि वाद यामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढत चालले आहे. भौतिक गोष्टीत सुख शोधण्याच्या वृत्तीमुळे आपण समाधान हरवत चाललो आहोत. रियल लाईफ अन् रील लाईफ यातील सीमारेषा आपण पुसून टाकल्या आहेत; आणि मोबाइलसारख्या उपकरणात आपण गुरफटत चाललो आहोत. समोरासमोर बसून मनमोकळ्या गप्पा मारणे विसरून ऑनलाइनच्या आभासी जगात आपण जास्त रमतो. आपली बेगडी प्रतिमा समाजापुढे दाखविण्याचा आपला प्रयत्न असतो. बदलेली जीवनशैली, समजूतदारपणाचा अभाव, अहंभाव, नकार न पचविण्याची मानसिकता, व्यसनाधीनता, तुलना आणि दुसर्‍याशी स्पर्धा करण्याची वृत्ती, तडजोडीचा अभाव, नैराश्य अशा वैगुण्यांमुळे वैवाहिक जीवनात विसंवाद वाढले असून त्याची परिणती संबंधविच्छेदनात होत आहे. त्यामुळे विवाहपूर्व समुपदेशन खूप महत्त्वाचे आहे. आपण स्वतः, कुटुंब आणि समाज या दुर्दशेला जबाबदार आहोत. मन मोकळे करता येईल असा एकही मित्र नसणे ही सामाजिक शोकांतिका झाली आहे. स्वसंवादाअभावी विस्मरण अर्थात अल्झायमर्स या विकाराचा प्रादुर्भाव जागतिक स्तरावर वाढतो आहे. यासाठी स्वसंवाद आणि परस्पर संवाद खूप गरजेचा आहे. छंद जोपासणे, वय विसरून लहान मुलांमध्ये रमणे अशा उपायांनी यावर मात करता येईल!’

व्याख्यानादरम्यान विद्युत पुरवठा खंडित झाला तरी श्रोते शांतपणे जागेवर बसून होते. त्यामुळे फणसळकर यांनी श्रोत्यांमध्ये येऊन संवाद साधला; तसेच विविध किस्से आणि उदाहरणे उद्धृत करीत श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. महेश गावडे, सचिन डोंगरे, बाळासाहेब कुंभार, नितीन हिरवे यांनी संयोजनात सहकार्य केले. कैलास गावडे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button