ताज्या घडामोडीपिंपरी

न्यायसंहितेतील बदलांमुळे महिलांना दाद मागणे अधिक सुलभ! – ॲड. सतिश गोरडे

Spread the love

 

शिरूर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘न्यायसंहितेतील बदलांमुळे महिलांना दाद मागणे अधिक सुलभ झाले आहे!’ असे मार्गदर्शनपर विचार ज्येष्ठ विधिज्ञ आणि विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे यांनी गणपती मंदिर सभागृह, रांजणगाव येथे व्यक्त केले.

विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित दोन दिवसीय दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी ॲड. सतिश गोरडे बोलत होते. यावेळी विश्व हिंदू परिषद माजी प्रांतमंत्री व पालक विजय देशपांडे, दुर्गावाहिनी प्रांत संयोजिका सोनाली नाथ, सहसंयोजिका आरती भारती, कार्तिकी परदेशी, जिल्हामंत्री गणेश रौंधळ, नानासाहेब लांडे आणि संदेश साळुंखे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘न्यायसंहितेतील बदलांमुळे कोणत्याही महिला भगिनीला आपल्याकडे वाईट नजरेने पाहणे, चुकीचा स्पर्श करणे, लज्जा निर्माण होईल असे वर्तन करणे अशा घटनांविरोधात आपल्या घरातून तक्रार नोंदविता येते. यासाठी आता प्रत्यक्ष पोलीस स्थानकात जाऊन तक्रार करण्याची गरज नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून आता फिर्याद नोंदवून दाद मागता येते; फक्त तक्रारीत विधिसंघर्षित व्यक्तींची संख्या व वर्णन, गुन्ह्याची जागा, वार, दिनांक, वेळ इत्यादी तपशील अचूक नमूद करावा. त्यानंतर संबंधित पोलीस स्थानकातील महिला अधिकारी अधिक चौकशी करून फिर्याद दाखल करून घेतात!’

शौर्य प्रशिक्षण वर्गात सोनाली नाथ आणि आरती भारती यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना, दुर्गावाहिनी स्थापनेचा उद्देश याविषयी सविस्तर माहिती दिली. कार्तिकी परदेशी, प्रार्थना कुलकर्णी आणि अनिष्का परदेशी यांनी प्रात्यक्षिकांसह समता, दंडयुद्ध व स्वसंरक्षण या बाबींची माहिती दिली. गणेश रौंधळ, नानासाहेब लांडे, संदेश साळुंखे यांनी संयोजन केले. विजय देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. गायत्री कौदरे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button