नार्वेकरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह- सुषमा अंधारे

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- ज्यांच्यामुळे शिवसेनेतील दिग्गज नेते पक्ष सोडून गेले, त्यांनीच शिवसेनेविरोधात निकाल देऊन स्वतःचा राजकीय आत्मघात करून घेतल्याची खरमरीत टीका शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज बालगंधर्व कलादालनात बोलताना केली.
बालगंधर्व कलादालनात आयोजित प्रसिध्द व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या “बाळकडू 2” या व्यंगचित्र प्रदर्शनाला आज सुषमा अंधारे यांनी भेट दिली, त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी प्रसिध्द व्यंगचित्रकार अमित पापळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, काल झालेल्या महापत्रकार परिषदेत जनता अदालतीमध्ये झालेल्या सादरीकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रासमोर नार्वेकर खोटे पडले आहेत, उघडे पडले आहेत. त्यांनी दिलेल्या निकालामुळे ते जनतेचा विश्वास गमावून बसले असून भारतीय जनता पक्षाने त्यांच्या राजकीय बळी घेतला आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासंबंधी बोलताना त्या म्हणाल्या की, मुख्य सचिव पुण्यात येऊन बालगंधर्व पाडण्यासंदर्भात वक्तव्य करतात, हे निषेधार्ह असून बालगंधर्व रंगमंदिर आजही सुस्थितीत असताना त्याचे पाडकाम करणे चुकीचे आणि गैर आहे. बालगंधर्व रंगमंदिरच्या पुनर्विकासासाठी होणाऱ्या पाडकामामुळे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार या सगळ्यांबरोबरच पडद्यामागील कलाकार आणि मदतनीस यांच्या देखील जीवन मरणाचा प्रश्न उभा राहणार आहे.
चौकट -पापळ संवदेनशील व्यंगचित्रकार यावेळी व्यंगचित्र पाहून बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, राजकीय घडामोडींचे अचूक आणि सखोल ज्ञान असलेले अमित पापळ हे संवदेनशील व्यंगचित्रकार आहेत. त्यांच्या कुंचल्यातून येणाऱ्या फटकाऱ्यांना वेगळा अर्थ प्राप्त होतो. राजकीय घडामोडींवर ते मार्मिक आणि बेधडकपणे व्यक्त झाले आहेत. सर्व नागरिकांनी आवर्जून बघावे, असे हे व्यंगचित्र प्रदर्शन आहे.









