Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – वडमुखवाडी, चऱ्होलीतील पाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. “नागरिकांच्या संयमाचा बांध आता  फुटला असून धरण भरलेले असताना नागरिकांना चार ते पाच दिवस पाणी मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. गेल्या दहा वर्षातील नियोजनशून्य आणि भ्रष्टाचारी कारभारामुळे  “पाणीबाणी”ची परिस्थिती उद्भवली असल्याची घणाघाती टीका अजित गव्हाणे यांनी केली. येथील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत चऱ्होली परिसरात महापालिकेने टँकरने मोफत पाणीपुरवठा करावा अशी आग्रही मागणी गव्हाणे यांनी केली आहे.
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि 26) नागरिकांनी हंडा मोर्चा काढून या भागात ओढवलेल्या पाणी संकटाकडे लक्ष वेधले. यावेळी साई नगर, माऊली नगर, लक्ष्मी नारायण नगर,मोरया नगर, तापकीर नगर, ताजने मळा, बुर्डे वस्ती  या भागातील नागरिकांनी हंडा मोर्चामध्ये सहभाग घेतला. महिला बहुसंख्येने यावेळी उपस्थित होत्या. माजी नगरसेवक विनया तापकीर, अनुज प्रदीपआबा तापकीर, अनिल तापकीर, कुणाल तापकीर, दत्ताभाऊ बुर्डे, गणेश तापकीर, सागर तापकीर, अनिल सुदाम तापकीर, तुकाराम तापकीर, शुभम तापकीर, चेतन तापकीर, माऊली तापकीर, ऋषिकेश तापकीर, मीरा काळजे, माधुरी भोसले, अनिता देवकर आदीं यावेळी उपस्थित होत्या.
अजित गव्हाणे म्हणाले,पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात वेगाने विकसित झालेला भाग तसेच पिंपरी चिंचवड आणि पुण्याला दुवा साधणारा मध्यवर्ती बिंदू असल्यामुळे चऱ्होली, वडमुखवाडी आणि डुडुळगाव या भागामध्ये प्रचंड लोकवस्ती वाढली आहे. मोठे गृहप्रकल्प झाले आहेत.  त्यामुळे हा भाग रेसिडेन्शिअल हब म्हणून ओळखला जात आहे. मात्र या भागाला पाण्यासाठी ओरड करावी लागते ही मोठी शोकांतिका आहे. येथील अनेक सोसायट्यांमध्ये चार ते पाच दिवस पाणी येत नाही. टँकरने पाणी घ्यावे लागते. वारंवार नागरिक, सोसायटी धारक तक्रारी करत असूनही कोणी लक्ष देत नाही.  पाण्याच्या तक्रारी करणाऱ्या नागरिकांना अधिकारी दुरुस्तर करतात. वाटेल तसे बोलतात. त्यामुळे नागरिक तसेच सोसायटीधारकांचा संयमाचा बांध फुटला आहे. अनेकांनी माझ्याकडे तक्रारी केल्यामुळे हा हंडा मोर्चा काढून भाजप आमदारांच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे.
चऱ्होलीत पाण्याची चोरी
चऱ्होलीत पालिकेच्या पाण्याच्या टाकीवरून
पाण्याची चोरी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पाण्याची चोरी होत असल्याचा आमच्याकडे पुरावा असल्याचेही नागरिक यावेळी म्हणाले. पालिका प्रशासनाने याची चौकशी करावी. नागरिकांना वाटेल तसे बोलून अपमान करणारा अधिकारी यात सामील असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
उग्र आंदोलन करू
हंडा मोर्चा काढून प्रशासनाला जागे केले आहे. येथील पाण्याचा प्रश्न तातडीने सुटला नाही तर आगामी काळात उग्र आंदोलन करू असा इशारा माजी नगरसेविका विनया तापकीर यांनी दिला.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version