Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “सर्व जातीपातींना एकत्र आणणारे अध्यात्म गरजेचे आहे!” असे विचार ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
गुरुपौर्णिमेनिमित्त गांधीपेठ तालीम मित्रमंडळाने आयोजित केलेल्या ‘मन करा रे प्रसन्न’ या मासिक प्रवचनमालिकेंतर्गत ‘अध्यात्म, गुरू आणि शिष्य’ या विषयावर निरूपण करताना डॉ. संजय उपाध्ये बोलत होते. आळंदी देवस्थानचे विश्वस्त अभय टिळक, डॉ. प्रताप कोठारी, सुबोध गलांडे, विकास नाणेकर, विनायक यादव, साधना काळे आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अंजली कुलकर्णी, चंद्रकला शेडगे, नेहा कुंभोजकर, गीतल गोलांडे, हेमा सायकर, सुप्रिया सोळांकुरे, रत्नमाला बोरकर, मंदाकिनी चोपडे यांनी डॉ. संजय उपाध्ये यांना विधिवत औक्षण करून गुरुवंदन केले.
डॉ. संजय उपाध्ये पुढे म्हणाले की, “संतांनी भारुडांसारख्या मनोरंजनातून लोकप्रबोधन केले. पंचमहाभूतांपासून आपण निर्माण झालो आहोत. त्यामुळे ‘कोsहम?’ अर्थात ‘मी कोण आहे?’ हा प्रश्न निरर्थक आहे. भक्तीचा अहंकार करणे व्यर्थ आहे; तसेच आध्यात्मिक गुरुंनी कर्मठपणा सोडून सोप्या शब्दांत अध्यात्म समजावून सांगितले पाहिजे. भक्तिभाव शिष्यांच्या अंत:करणात असावा, भक्तीचे प्रदर्शन नको हे गुरुंनीच सांगितले पाहिजे. आध्यात्मिक गुरुंनी कर्मयोग शिकवायला हवा. त्याचबरोबर व्यवहारात निष्क्रियता निर्माण करणारे अध्यात्म आता कटाक्षाने बाजूला ठेवा. जातीपाती विसरून फक्त भारतीय म्हणून आपल्या संस्कृतीचे संवर्धन करणे अतिशय गरजेचे आहे!” संतवचने, श्लोक, कविता उद्धृत करीत मिस्कील शैलीतून उपाध्ये यांनी विषयाचे निरूपण केले.
महेश गावडे, बंडू भोकरे, प्रशांत गोलांडे, नवनाथ सरडे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
Share.
Leave A Reply

Exit mobile version