Spread the love

 

नरेंद्र मोदींनी गरिबांना धन्य तर शेतकरी व महिलांना सन्मान दिला – श्रीरंग बारणे

किवळे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी गोरगरिबांना अन्नधान्य तर शेतकरी व महिलांना सन्मान दिला. मोदींनी रक्ताचा थेंबही न सांडवता जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली. जगामध्ये भारताचे मान उंचावली. त्यामुळे त्यांना पुन्हा पंतप्रधान करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे, असे मत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.

देहूरोड किवळे इथे आयोजित करण्यात आलेल्या नमो संवाद सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटिका शैलाताई पाचपुते तसेच शीलाताई भोंडवे, नानासाहेब डोईफोडे, सुदाम दिवटे, गौतम गायकवाड, प्रकाश साबळे, रवींद्र कदम, मीनाताई डेरे, सुनीता संदणे, निशाताई ओव्हाळ, मनोज थोरवे, सुरेश नायर, विनोद चांदमारे व परिसरातील महिला बचत गटांच्या सदस्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नमो संवाद सभांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदींसारख्या सक्षम नेतृत्वाकडे देश पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा सोपविणे गरजेचे आहे. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.

पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती खासदार बारणे यांनी यावेळी दिली. मेट्रोच्या पुढील टप्प्यात निगडी ते किवळ्याचा मुकाई चौक असा विस्तार करण्यात येणार आहे. मुकाई चौकातून मेट्रो निगडी, वाकड, स्वारगेट, रामवाडी, चाकण या मार्गांना जोडली जाणार आहे. त्यामुळे परिसराचा विकास अधिक मोठ्या प्रमाणात होईल, असे त्यांनी सांगितले.

देहूरोड ते बालेवाडी हा साडेआठ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्यामुळे देहूरोड किवळे भागातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नही सुटेल, असा विश्वास बारणे यांनी व्यक्त केला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version