Spread the love

१० वीरपत्नींना ‘वीर नारी सन्मान’, विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त  सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने १४ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत सप्ताहभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये ‘एकता, समरसता आणि राष्ट्राभिमान’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित देशभक्तिपर, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. भारताला समृद्ध, सशक्त आणि जागतिक पटलावर अग्रगण्य बनविण्याच्या ‘विकसित भारत’ या राष्ट्रव्यापी प्रवासात सूर्यदत्त शिक्षण संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने अग्रभागी राहिला आहे.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली या सर्व उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. विद्यार्थी घडला तरच समाज घडतो आणि सशक्त समाजातूनच समृद्ध राष्ट्राची निर्मिती होते, या विचारावर डॉ. चोरडिया यांची अढळ श्रद्धा आहे. म्हणूनच सूर्यदत्तच्या माध्यमातून शिक्षणासोबतच संस्कार, आरोग्य आणि राष्ट्रनिर्मितीची एक अखंड चळवळ उभारली आहे.

या महोत्सवात देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या १5 वीरपत्नींचा विशेष ‘वीर नारी सन्मान’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट रोजी मुख्य स्वातंत्र्यदिन सोहळ्यात कर्नल पाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण पार पडेल, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा ‘सूर्य चक्र पुरस्कार’ देऊन गौरव केला जाईल. याशिवाय, भारताची समृद्ध परंपरा आणि शूरवीरांचा इतिहास जिवंत करणारा भव्य देशभक्तीपर फॅशन शो, विशेष नाट्य सादर होईल.

या निमित्ताने ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानाला बळ देण्यासाठी भारतातील पारंपरिक हस्तकला, विविध स्वदेशी हस्तनिर्मित उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. ‘फिट इंडिया’ उपक्रमांतर्गत क्रीडा, योग व फिटनेस सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेवर आधारित विविध राज्यांचे लोकनृत्य, समूहगायन, देशभक्तीपर संगीताचा ऑर्केस्ट्रा आणि भारतीय खाद्यसंस्कृतीचे स्टॉल्स असणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी निबंध व पोस्टर स्पर्धा, पथनाट्ये, पुस्तक प्रदर्शन, परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्तीविषयी व्याख्यान, विविध संकल्प करणे, गोशाळा आणि अनाथालयाला भेट देणे अशाही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “स्वातंत्र्यदिन हा ध्वजारोहण आणि राष्ट्रगीतापुरता मर्यादित राहता कामा नये. या निमित्ताने ‘विकसित भारत’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पना प्रत्येक विद्यार्थ्याच्या विचारात आणि कृतीत रुजवणे गरजेचे आहे. ‘सूर्यदत्त’ प्रत्येक विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देतानाच त्याला एक जबाबदार, सुजाण आणि देशभक्त नागरिक बनवण्यासाठी कटिबद्ध आहे.”

सुषमा चोरडिया म्हणाल्या “स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षात विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि देशसेवेची भावना रुजवणे ही काळाची गरज आहे. वीर नारींचा सन्मान आणि विविध उपक्रमांतून स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा सूर्यदत्तचा प्रयत्न आहे. सक्षम, संस्कारी आणि जबाबदार युवा पिढीच विकसित भारताची खरी ताकद ठरेल.”

स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची प्रेरणा, भारतीय संस्कृतीचा अभिमान, देशसेवेची भावना आणि भविष्य घडविण्याची जिद्द विद्यार्थ्यांच्या मनात रुजवत ‘माझा देश, माझी जबाबदारी’ हा विचार प्रत्येक युवा मनापर्यंत पोहोचविण्याचा सूर्यदत्तचा हा प्रयत्न आहे. आजच्या विद्यार्थ्यांच्या मनात पेटलेली राष्ट्रप्रेमाची ज्योतच उद्याच्या विकसित भारताचा प्रकाश बनेल, असा आम्हाला विश्वास आहे. ‘विकसित भारता’च्या उभारणीत सूर्यदत्त शिक्षण समूह सदैव अग्रभागी राहील,” असेही त्यांनी नमूद केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version