
किवळे गृह प्रकल्प लाभार्थींचा अंत पाहू नका.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या रावेत येथील गृहप्रकल्पासाठी महानगरपालिकेने अर्ज स्वीकारले ते प्रकल्प मनपाच्या चुकीमुळे पूर्ण होऊ शकला नाही म्हणून आता किवळे गृहप्रकल्पातील घरे सदरच्या लाभार्थ्यांच्या माथी दुप्पट किमतीने देण्यात आले. मात्र त्याचा ताबा देण्यासाठी अनेक महिने जात आहेत. येत्या ८ दिवसात ताबा न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आज कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून किवळे गृहप्रकल्पातील लाभार्थ्यांची दिशाभूल करून अर्ज स्वीकारण्यात आले सुमारे २ वर्षापासून ही प्रक्रिया सुरू आहे. एकूण ५ वर्षापासून या लाभार्थ्यांची पिळवणूक करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे महानगरपालिका देत नाही आणि प्रामुख्याने त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. येथील लाभार्थ्यांचे बँकेमध्ये कर्ज प्रकरणे मंजूर झाले ४ ते ६ महिन्यांचा हप्ता अनेकांनी भरलेला आहे आणि त्यांना ताबा मात्र महानगरपालिका देत नाही.
कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे यावेळी दोन वेळा आंदोलन करण्यात आले, त्यावेळी मुद्रांक शुल्क माफ करण्याचे सांगण्यात आले मात्र त्यास ही टाळाटाळ केली जात आहे. गृहप्रकल्पात सोयी सुविधा दिल्या जात नाहीत, पंतप्रधान आवास योजनेतून लाभ देण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी आज कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्राच्या मध्यवर्ती कार्यालय चिंचवड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गृह प्रकल्पातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आपल्या समस्या मांडल्या यावेळी पुढील मागण्यासाठी लवकरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मागण्या
१)किवळे गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना ताबा त्वरित देण्यात यावा.
२) ग्रह प्रकल्पाचा ताबा जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लाभार्थ्यांची बँक हप्ते महानगरपालिकेने भरावीत.
३) मुद्रांक शुल्क माफ करून त्यांचे रजिस्ट्रेशन त्वरित करून द्यावे.
४) गृहप्रकल्पात सोयी सुविधा देण्यात याव्यात.
५) पंतप्रधान आवास योजनेतून लाभार्थींना अर्थसहाय्य देण्यात यावे.
या प्रमुख मागण्या समोर ठेवून तीव्र आंदोलनाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

