Spread the love

देहूगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा अखंड गजर, “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषाने दुमदुमलेले वातावरण, टाळ-मृदंगाचा निनाद आणि लाखो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग अशा भक्तिमय वातावरणात श्रीक्षेत्र देहूगाव येथून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दुपारी ३ वाजता प्रस्थान ठेवले. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यंमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विधिवत पूजा यावेळी संपन्न झाली.

मानाच्या अश्वांची प्रदक्षिणा, पारंपरिक धार्मिक विधी, मानकरी, दिंड्यांचे वीणेकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्याने अवघे देहू भक्तिरसात न्हाऊन निघाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या या पालखी प्रस्थान सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह देशाच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी देहूनगरी फुलून गेली होती. पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी, ढगाळ हवामानात पावसाला आनंदाने अंगावर घेत अत्यंत उत्साही आणि प्रसन्न वातावरणात जलाभिषेक करीत वैष्णवांचे दैवत असलेल्या पांडूरंगाच्या भेटीला जाण्यासाठी तुतारी, टाळ मृदंगाच्या निनाद, विण्याचा झंकार करीत वारकऱी मुक्तपणे ध्येयभान हरखून विविध पाऊलांसह फुगड्या खेळत आनंद व्यक्त करीत होते.

विधिवत पूजेनंतर हा पालखी सोहळा प्रदक्षिणेसाठी भजनी मंडपातून बाहेर पडला. सायंकाळी सहाच्या सुमारास हा सोहळा इनामदार वाड्यात पहिल्या मुक्कामासाठी रवाना झाला. आषाढी वारीत सहभागी झालेले वारकरी खांद्यावर भागवत धर्माची भगवी पताका आणि महिला वारकऱ्यांनी डोक्यावर तुळशीवृंद घेऊन मुखी हरिनामासह ‘‘ज्ञानोबा- तुकाराम’’ हा जयघोष करीत हा पालखी सोहळा लाखो भाविकांचा भक्तीचा महासागर पंढरीच्या वाटेला लागला. यावेळी चोपदाराचा दंड आणि शिंगाड्याच्या आवाज होताच साऱ्या आसमंतांत मृदंग, टाळ,विणा यांच्या निनाद गुजला आणि सार देऊळवाडा परिसर दमाणून गेला होता.

श्री क्षेत्र देहूगाव मध्ये पालखीचे प्रस्थान असल्याने मुख्य मंदिर, वैंकुठगमण मंदिर परिसरातील पहाटे पासूनच फुललेला होता. भाविकांच्या जीविताची काळजी घेण्यासाठी पहाटे पासून इंद्रायणी नदी काठी आंघोळीला जाण्यासाठी पोलीस मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे भाविकांना ज्या ठिकाणी मुक्काम केला होता त्याच ठिकाणी आंघोळ करून भाविकांनी व वारकऱ्यांनी थांबावे असे अवाहन संस्थान, नगरपंचायत प्रशासन व पोलीस प्रशासन यांच्याकडून करण्यात येत होते.

प्रथेनुसार प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटे पाच वाजता विठ्ठल रुक्मीनी मंदिरात व शीळा मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पालखी सोहळा प्रमुख लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, शिळा मंदिरात विक्रमसिंह महाराज मोरे व संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, तर नारायण महाराज समाधि मंदिरात दिलीप महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यानंतर सहा वाजता पूजारी सदाशिव महाराज मोरे यांच्या हस्ते वैंकुठगमण मंदिरात महापूजा करण्यात आली. सकाळी दहा वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याच्या काल्याचे किर्तन पुंडलिक महाराज मोरे देहूकर यांनी केले. या किर्तनात त्यांनी जुझीये संगती | झाली आमुची निश्चिती || नाही देखीले ते मिळे | भोग सुखाचे सोहळे || या अभंगाचे निरुपण करत पालखी सोहळ्याच्या अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याची सांगता करण्यात आली. दरम्यानच्या काळात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णा सोळंकी गंगा म्हसलेकर यांनी श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका घोडेकर सराफ यांच्या कुटुंबियांकडे चकाकी देण्यासाठी रथापुढील पहिली मानाची म्हतारबुवा दिंडीने टाळ मृदंगाच्या तालावर हरिनामाचा गजर करीत नेण्यात आल्या. घोडकर सराफांच्या वतीने सुनिल घोडेकर, अनिल घोडेकर, ऋषिकेश घोडेकर आदींनी पादुकां परंपरे प्रमाणे रिठे, व पितांबरी यांच्या मदतीने चकाकी दिली. यानंतर पालखी सोहळ्यातील मानचे सेवेकरी कृष्णा सोळंकी गंगा म्हसलेकर यांनी पादुका घोडेकर यांच्या अभंग आरती करून घरातून घेऊन इनामदार वाड्यात नेण्यात आल्या.

इनामदार वाड्यात विश्वस्त दिलीप महाराज मोरे गोसावी यांच्या हस्ते पादुकांची विधीवत पूजा करण्यात आली. ही पूजा व काल्याचे किर्तन उरकल्यानंतर पादुका इनामदार वाड्यातून मानकरी गंगा म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. म्हतारबा दिंडीसह ह्या पादुका डोक्यावर घेऊन टाळ मृदंगाच्या तालवर भक्तीमय वातावरणात टाळ मृदंगाच्यासाथीत वाजत गाजत मुख्यमंदिरात आणण्यात आल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version