Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पुरंदर तालुक्यातील बेलसर गावच्या हद्दीतील चोपनवस्ती येथे वाडा ऍग्रो मशरूम कंपनीत भीषण दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ह्रदयदावक व अत्यंत गंभीर आहे. सदरच्या कंपनीत बंद टाकीची स्वच्छता करण्यासाठी मशरूम कंपनीत बेजबाबदारपणे काम करण्यास लावल्याने सुरक्षिततेची काळजी न घेतल्यानेच तीन निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी २० लाख रुपये द्या अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुख्यमंत्री कामगार मंत्री यांच्याकडे केली आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेलसर येथील एरो मशरूम कंपनी आणि व्यवस्थापनाने कामगारांना धोकादायक रित्या कामास लावण्यात आले. दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी ३.३० च्या सुमारास पिंटू राजेश प्रसाद, सोहम कुमार व्यास, गौतम रामसुरण कुशवाह या कामगारांना अत्यंत धोकादायक काम दिले गेले. कामाच्या स्वरूपाबाबत धोका माहित असूनही त्यांना मास्कसह कोणतीही सुरक्षा साधने न देता काम करण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणात संबंधित कंपनी व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच मृत कामगारांच्या कुटुंबीयांना तातडीने २० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नखाते यांनी पुढे सांगितले की, अशा दुर्घटना वारंवार घडत असून त्या रोखण्यात शासन अपयशी ठरत आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी कठोर नियमांची अंमलबजावणी करणे आणि त्यावर प्रभावी देखरेख ठेवणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version