Spread the love

 

-हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुण्यातील निर्भय बनो या कार्यक्रमाला जात असताना जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह ऍड.असीम सरोदे,विश्वंभर चौधरी,महिला वकील आणि चालक यांच्यावर भाजपाच्या गुंडांनी जीवघेणा हल्ला केला.हा हल्ला हे भ्याडपणाचे लक्षण असून हल्ला करणाऱ्यांची कृती निषेधार्ह आहे. या हल्लेखोरांना त्वरित अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे,पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष वैभव जाधव,शहर उपाध्यक्ष रावसाहेब गंगाधरे, संघटक संतोष शिंदे,वसंत पाटील आदींनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे निषेध नोंदविला.

काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की,जेष्ठ पत्रकार वागळे यांना ऍड.असीम सरोदे यांच्या घरी पोलीस क्लिअरन्ससाठी तीन तास अडवून ठेवले होते.नंतर संध्याकाळी ६ वाजता वागळे यांनी पोलीसांना सांगितलं की एकतर आम्हाला अटक करा, नाहीतर सभेला जाऊ द्या. त्यानंतर वागळे गाडीत बसले. त्यांच्या एका बाजूला ऍड.असीम सरोदे आणि एका बाजूला विश्वंभर चौधरी होते.गाडी पुढे गेल्यानंतर पहिला हल्ला प्रभात रोड येथील इराणी कॅफेजवळ झाला.मोटार सायकलवर आलेल्या भाजपच्या गुंडांनी आणि त्यांच्या रस्त्यावरच्या साथीदारांनी गाडीवर दगड आणि अंडी फेकली.थोडे पुढे म्हणजे प्रभात रोड जिथं कर्वे रोडला जोडतो तिथं भाजपाचे आणखी 25-30 गुंड उभे होते. त्यांनी कार अडवून गाडीवर काठ्या आणि राॅड मारत काचा फोडायला सुरूवात केली. त्यानंतर सेनादत्त पोलीस चौकीच्या सिग्नलवर हल्ला झाला. पुढे दांडेकर पुलाच्या सिग्नलला मोठे दगड मारल्यामुळे गाडीच्या मागच्या काचेचा चक्काचूर झाला होता. तिथून हे भाजपचे गुंड राॅड आत टाकण्याचा प्रयत्न करत होते. ऍड.असीम सरोदे यांनी वागळे यांचे डोके खाली धरून ठेवल्याने इजा झाली नसल्याचे वागळे यांनी देखील सांगितले.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसाढवळ्या खुनाचे प्रकार वाढले आहेत.यावर आळा घालायला राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सपशेल अपयशी ठरले आहेत.कालचा हल्ला भीती घालण्यासाठी असला तरी त्यामुळे लोकशाही बचावासाठीची लढाई आणखीन बळकट होईल.तसेच कायदा सुव्यस्था सुरळीत ठेवता येत नसल्याची धमक गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाही त्यामुळे फडणवीसांनी राजीनामा देण्याची मागणी केली यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version