Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मातंग साहित्य परिषद, पुणेतर्फे दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाचे काळेवाडी-पिंपरी येथे रविवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले आहे. संमेलन ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक, मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी निवेदनाद्वारे दिली.

संमेलन राजवाडा लॉन्स, राजवाडे नगर येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 9:30 वाजता पंचनाथ चौक ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. 10:30 वाजता उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला असून संमेलनाचे उद्घाटन गारवे हुंदाईचे संचालक डॉ. किरण गारवे यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, पुणे पुस्तक महोत्सवाचे प्रमुख राजेश पांडे, स्वागताध्यक्ष शंकर जगताप यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संमेलनानिमित्त पौराणिक व शिवकालीन शस्र प्रदर्शनी भरविण्यात येणार आहे.
डॉ. प्रभाकर मांडे यांचे ‌‘मांग आणि त्याचे मागते’, भारतीय संस्कृतीतील कालसंगत व विसंगत परंपरा, भारतीय समाजव्यवस्थेत मातंग समाजाची झालेली पिछेहाट : कारणे व उपाय या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे वाङ्मय पुरस्कारांचे या प्रसंगी वितरण होणार आहे.

केंद्रीय आयोग भटके विमुक्त जाती-जमातीचे माजी अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. बळीराम गायकवाड यांची उपस्थिती असणार आहे.
आमदार अश्विनी जगताप, महेश लांडगे, उमा खापरे, सुनील कांबळे, दिलीप कांबळे, लक्ष्मण ढोबळे, अमित गोरखे, अमर साबळे यांची संमेलनात उपस्थिती असणार आहे.

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी भाऊसाहेब अडगळे, संदिपान झोंबाड, विलास लांडगे, अनिल सौंदडे,राजू आवळे, अविनाश शिंदे, नाना कसबे, नाना कांबळे, दादा भाऊ आल्हाट प्रयत्नशील आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version