Spread the love
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तळेगाव दाभाडे येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला अखेर मोठा दिलासा मिळाला असून, नगरपरिषदेच्या माध्यमातून यशवंत नगर येथे ३ एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण आज उत्साहात संपन्न झाले. आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे स्टेशन परिसरातील नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरपरिषदेच्या सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे सत्यकमल कॉलनी, म्हाडा कॉलनी, रेनो कॉलनी, स्टेशन चौक आणि यशवंत नगर परिसरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार असून चौराई येथील मुख्य जलशुद्धीकरण प्रकल्पावरील ताणही कमी होणार आहे.
स्टेशन भागातील नागरिकांना पाण्यासाठी दररोज करावी लागणारी कसरत लक्षात घेऊन हा प्रकल्प साकारण्यात आला असल्याचे सांगताना आमदार शेळके यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देण्याचा आपला संकल्प पुन्हा अधोरेखित केला. तसेच तळेगाव स्टेशन परिसरासाठी आंद्रा धरणातून बंदिस्त पाईपलाईन योजनेला अंतिम टप्प्यात मंजुरी मिळत असून, लवकरच या योजनेची कामेही सुरू होणार असल्याने भविष्यात पाणीटंचाईचा प्रश्न पूर्णतः मार्गी लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला पाणीप्रश्न सुटल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार सुनील शेळके यांचे आभार मानले. या लोकार्पण सोहळ्यास नगराध्यक्ष संतोषभाऊ दाभाडे, सुरेशभाऊ चौधरी, नाना कारके, दर्शनदादा खांडगे, गणेशजी काकडे, सुरेशजी धोत्रे, इंदरजी ओसवाल यांसह नगरसेवक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version