Spread the love

पिंपरी चिंचवड, हिंजवडीसह पश्चिम पुण्याची कोंडी फुटणार

नवले पूलापासून जोडणारा १५.८७ किलोमीटरचा प्रकल्प प्रस्तावित; वाहतूक नियोजनाला बुस्टर

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नवले पुलाला जोडणारा देहूरोड ते सुतारवाडी असा सुमारे १५.८७ किलोमीटर लांबीचा सहा पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर (उड्डाणपूल) प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड, हिंजवडी आयटी पार्कसह लगतच्या उपनगरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मंगळवारी पुण्यातील नवले उड्डाणपुलाच्या सद्यस्थिती बाबत सभागृहात प्रश्न विचारण्यात आला होता. या अनुषंगाने आमदार शंकर जगताप यांनी नवले ब्रिज पासून सुतारवाडी ते देहूरोड या एलिव्हेटेड कॉरिडॉर संदर्भातील कामाबाबत विचारणा केली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री योगेश कदम यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) विविध उपाययोजना केल्या जात आहेत. देहूरोड ते सुतारवाडी या मार्गाचे भूसंपादन, सेवा रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामांना प्राधान्य दिले जाणार आहे असेही आमदार जगताप यांनी सांगितले. नाशिक फाटा ते खेड या आठ पदरी एलिव्हेटेड मार्गाच्या धर्तीवर हा प्रकल्प साकारला जाणार असून, आगामी काळात पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा रस्ता मैलाचा दगड ठरणार आहे.

हिंजवडी आयटी हबसाठी वरदान

हिंजवडी आयटी पार्क आणि लगतच्या गावांमध्ये वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. या प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे वाकड, ताथवडे, पुनावळे, रावेत या पिंपरी-चिंचवडमधील भागांसह बालेवाडी, बाणेर, सुस आणि बावधन या पुणे शहराच्या भागांतील प्रवास गतिमान होणार आहे. तसेच माण, मारुंजी, नेरे, जांबे, कासारसाई आणि किवळे या परिसरातील नागरिकांनाही याचा मोठा लाभ मिळेल.

“पिंपरी-चिंचवड आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी देहूरोड ते सुतारवाडी हा १५.८७ किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रकल्पामुळे केवळ प्रवास वेगवान होणार नाही, तर शहराच्या कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळणार आहे. शासनाने या कामाला गती देऊन भूसंपादन आणि सेवा रस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत, हीच आमची आग्रही मागणी आहे.सेवा रस्त्यांचे रुंदीकरण आणि या उड्डाणपुलामुळे भविष्यातील वाहतुकीचे नियोजन अधिक सक्षम होईल. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

— शंकर जगताप, आमदार,

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version