पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रत्येक प्रभागात मूलभूत नागरी सुविधा दर्जेदार आणि सुरळीतपणे मिळणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. योग्य दाबाने पाणीपुरवठा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, अतिक्रमणमुक्त रस्ते तसेच पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध आणि समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महापालिका शाळांमधील सुविधा अधिक सक्षम करणे, हॉकर्स झोनचे योग्य नियोजन करणे आणि ‘माझी वसुंधरा’ उपक्रमात शहराला अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आरोग्य, अतिक्रमण, पाणीपुरवठा, स्थापत्य, उद्यान, पशुवैद्यकीय आदी विभागांचा आढावा घेण्यासाठी महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकांचे आयोजन केले जात आहे. आज नेहरूनगर येथील ‘क’ क्षेत्रीय कार्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस विधी समिती सभापती सुजाता बोराटे, माजी महापौर तथा नगरसदस्य राहुल जाधव, माजी महापौर तथा नगरसदस्या वैशाली घोडेकर, नगरसदस्य तुषार सहाणे, योगेश लांडगे, निखिल बो-हाडे, नगरसदस्या सारिका मासुळकर, सारिका बोऱ्हाडे, नम्रता लोंढे, अश्विनी वाबळे, रेखा देवकर, उपआयुक्त प्रदीप ठेंगल, क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्यासह स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, शहरी दळणवळण, जलनिस्सारण या विभागांचे कार्यकारी अभियंते आणि इतर संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना महापौर रवि लांडगे यांनी शहरातील मूलभूत नागरी सुविधांबाबत अधिक काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील प्रत्येक प्रभागात नागरिकांना सुरळीत व योग्य दाबाने पाणीपुरवठा होणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी असून त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी संबंधित विभागांनी नियमित तपासणी करावी तसेच या उपाययोजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर नागरिकांना पाण्याचा पुरवठा ठराविक वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने मिळावा यासाठी पाण्याच्या वेळापत्रकाबाबतही योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय, महापौर रवि लांडगे यांनी पाणी शुद्धीकरण प्रक्रियेला अधिक सक्षम करण्यावर भर दिला. पाणीपुरवठा यंत्रणेची नियमित तपासणी करून नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शहरातील रस्त्यांवर ज्या ठिकाणी वारंवार कचरा साचतो त्या ठिकाणांचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश देत अशा ठिकाणी सौंदर्यीकरण केल्यास नागरिक कचरा टाकण्याचे प्रमाण कमी होईल, असे त्यांनी सांगितले. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक प्रभागातून कचऱ्याची ठिकाणे पूर्णपणे हटवून शहर अधिक स्वच्छ व सुबक करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
याशिवाय प्रत्येक प्रभागातील सार्वजनिक शौचालयांची नियमित देखभाल, दुरुस्ती व स्वच्छता याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करावी, असे त्यांनी सांगितले. शहरातील काही भागांमध्ये अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असून पादचाऱ्यांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे ज्या ठिकाणी अतिक्रमणामुळे रहदारीस किंवा पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे, त्या ठिकाणांवरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय शहरात जास्तीत जास्त वृक्षलागवड करण्यावर भर देण्याचेही महापौरांनी सांगितले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड अत्यंत महत्त्वाची असल्याने महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध आहे का याची खातरजमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवावेत, असेही त्यांनी सांगितले.
हॉकर्स झोनच्या नियोजनाबाबतही महापौरांनी महत्त्वपूर्ण सूचना देत प्रत्येक प्रभागात नगरसदस्यांच्या सहकार्याने योग्य जागा निश्चित करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यामुळे फेरीवाल्यांचे नियोजनबद्ध पुनर्वसन होऊन शहरातील वाहतूक आणि पादचारी हालचाली अधिक सुलभ होतील, असे त्यांनी नमूद केले. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नगरसदस्यांच्या समन्वयातून प्रभागातील स्थानिक समस्या ओळखून त्या सोडविण्यावर अधिक भर द्यावा, असे निर्देश देण्यात आले.
याव्यतिरिक्त, राज्य शासनाच्या “माझी वसुंधरा” उपक्रमात शहराला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन महापौरांनी केले. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि शाश्वत विकास यांसंदर्भातील विविध उपक्रम प्रभावीपणे राबवून पिंपरी चिंचवड शहराचा मान उंचावण्यासाठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे यांनी विविध विभागांअंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच नगरसदस्यांनीही प्रभागात आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि समस्या महापौर लांडगे यांच्यासमोर मांडल्या.
