पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला गती देणारा असल्याचे मत भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर महामंत्री तथा केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार-प्रसार समितीचे संयोजक मधुकर बच्चे यांनी व्यक्त केले आहे.
या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा समतोल साधत सर्वसमावेशक विकासावर भर देण्यात आला असून शेतकरी, युवक, महिला, मध्यमवर्गीय नागरिक तसेच उद्योगक्षेत्र यांना केंद्रस्थानी ठेवून तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात कोणतीही उणीव दिसून येत नाही, असेही बच्चे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पायाभूत सुविधांचा विकास, रोजगारनिर्मिती, शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी देशाच्या दीर्घकालीन प्रगतीस पूरक आहेत. डिजिटल अर्थव्यवस्था, स्टार्टअप्स, नवउद्योजक तसेच आत्मनिर्भर भारताच्या दिशेने सरकारने ठोस पावले उचलली असून याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे.
महिला सक्षमीकरण, गरीब कल्याण योजना आणि ग्रामीण विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदी सरकारची सामाजिक बांधिलकी अधोरेखित करतात. तसेच आर्थिक शिस्त राखत विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.
हा अर्थसंकल्प देशाच्या सर्व स्तरातून नक्कीच कौतुकास पात्र ठरेल आणि भारताला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास मधुकर बच्चे यांनी व्यक्त केला.
