Spread the love
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आजच्या युवा पिढीचा सहभाग आवश्यक आहे. युवकांनी उत्कृष्टता, प्रामाणिकपणा आणि नवोन्मेष यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. मला दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या ठिकाणी भारत देशाविषयी आणि विशेषता महाराष्ट्रातील जागतिक दर्जाच्या पायाभूत सेवा सुविधांविषयी जागतिक दर्जाच्या गुंतवणूकदारांनी विश्वास व्यक्त केला आहे. तेथे झालेल्या विविध सामंजस्य करारामुळे आगामी काळात खूप मोठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक महाराष्ट्रात येईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. याचा लाभ घेण्यासाठी कुशल आणि नेतृत्व गुण संपन्न मनुष्यबळ घडवण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट नेहमी प्रयत्नशील आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यातील नेतृत्व गुण विकसित करीत असताना सतत नवीन शिकणे, कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे, जागतिक दर्जाचे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे असे मार्गदर्शन पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी केले.
    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) मध्ये भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
  यावेळी पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर  लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
   यावेळी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. अंजू बाला, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी,  प्र-कुलगुरु डॉ. सुदीप थेपाडे, तसेच प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी सांगितले की, भारताचे संविधान लोकशाही, समता व न्याय या मूल्यांचा अंगीकार करते. आपले जबाबदार वर्तन, नैतिक आचरण आणि दैनंदिन कृतीतून राष्ट्रनिर्मिती साठी हातभार लागत असतो. सर्वांनी संविधानिक मूल्यांचे पालन करावे असे आवाहन केले.
      चैतन्य आणि वैष्णवी या विद्यार्थ्यांनी सुमधुर देशभक्तीपर गीत सादर केले. प्रा. ईशा राखी यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. नायका तिवारी या विद्यार्थिनीने संविधानिक मूल्यांचे पालन करण्याविषयी संवाद साधला. प्रश्ना भेरे आणि सहकाऱ्यांनी भावस्पर्शी नाटिका सादरीकरण केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version