पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य कार्यालयात तसेच प्रत्येक प्रभाग कार्यालयामध्ये आचारसंहिता व्यवस्थापन कक्ष उभारण्यात आला आहे. तसेच ३७ एफएसटी, ३२ एसएसटी व ४४ व्हीएसटी पथकांमार्फत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी देखरेख ठेवण्यात येत आहे. या स्थापन करण्यात आलेल्या पथकांमार्फत व पोलीस विभागामार्फत १५ डिसेंबर २०२५ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत ६ दखलपात्र व ११ अदखलपात्र असे एकूण १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आचारसंहिता कक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी झाल्यानंतर तात्काळ प्रभावाने आचारसंहिता लागू झालेली आहे. या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या सार्वत्रिक निवडणुकीकरिता जाहीर प्रचार करण्याचा कालावधी दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता समाप्त झालेला आहे.
या निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपजिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्ष प्रमख सुरेखा माने यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या आचार संहिता कक्षाची स्थापन करण्यात आली होती. या कक्षाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या पथके व पोलीस विभागा मार्फत १५ डिसेंबर २०२५ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच १५ डिसेंबर २०२५ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागामार्फत १८ लाख २ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, ६२ लाख ७९ हजार १७८ रुपये किमतीचे मद्यपदार्थ, ४९ लाख ११ हजार ५३१ रुपये किमतीचा गांजा, ९ लाख ३३ हजार ३०० रुपये किमतीचे एमडी, ७ लाख ८९ हजार ७०० रुपये किमतीचे ओजी कुश असे अमली पदार्थ, एकूण १ लाख २९ हजार ५६१ रुपये किंमतीच्या १९ वॉशिंग मशिन्स, यासह ६ पिस्टल, ४ गावठी कट्टे, १५ काडतुसे, २३ धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच १ हजार ४ जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय १५ डिसेंबर २०२५ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयनिहाय अनुक्रमे ३, १०, २४, ५, ०, १५, ८ व १ तसेच इतर तक्रारी ५ अशा एकूण ७१ आचारसंहिता भंगाबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून या सर्व तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा आचार संहिता कक्ष प्रमुख सुरेखा माने यांनी दिली.
