Spread the love

 

“प्रभाग क्र. १७ मध्ये भाजपच्या दबावाच्या राजकारणाला थारा नाही” — शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. भोईरनगर येथील जयवंत प्राथमिक शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आक्रमक शैलीत भाजपवर जोरदार टीका केली.

या सभेस प्रभाग क्रमांक १७ मधील अधिकृत उमेदवार — मनिषा आरसूळ (अ गट), भाऊसाहेब भोईर (ब गट), शोभाताई वाल्हेकर (क गट) आणि शेखर चिंचवडे (ड गट) उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सभेत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसनेच केला येथील स्वच्छ रस्ते असतील राजीव गांधी आयटी पार्क असेल असे अनेक हमे कामे केली आहेत त्याचबरोबर अनेक रिकाम्या हातांना रोजगार दिला. “भाजपने सुसंस्कृत असल्याचे ढोंग करू नये. सरकारमधील सर्व यंत्रणा आपल्याच बापाच्या असल्यासारख्या वापरल्या जात आहेत. ठरवून, प्लॅन करून विरोधकांवर दबाव टाकण्याचे राजकारण सुरू आहे. पण पिंपरी-चिंचवडची जनता हुशार आहे, ती हे सर्व ओळखते.”

ते पुढे म्हणाले, “ज्या पक्षाने शिस्तीचे धडे दिले, त्या पक्षातच आता शिस्त राहिलेली नाही. जर शिस्तच उरली नसेल, तर आरएसएसच्या प्रमुखांनी त्यांचे कान टोचावेत,” असा घणाघात शिंदे यांनी केला. प्रभाग क्रमांक १७ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनुभवी, चारित्र्यसंपन्न व विकासाभिमुख असल्याचे सांगत शिंदे म्हणाले की, “हा प्रभाग विकासाच्या बाबतीत मागे पडला आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत सुविधा देण्याची ताकद फक्त या उमेदवारांमध्ये आहे.”

भोईर यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक १७ मध्ये हिंदू-मुस्लिम सर्व समाजातील नागरिक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असून येथे कधीही धर्माच्या नावावर भेदभाव करण्यात आलेला नाही. सर्वधर्मसमभाव आणि एकतेच्या विचारावर विश्वास ठेवूनच या प्रभागाचा विकास करण्यात आला आहे. आम्ही सत्तेत असताना सर्व समाजांना सोबत घेऊन अनेक लोकहिताची आणि समाजहिताची कामे प्रामाणिकपणे राबवली असून, पुढील काळातही हाच समन्वय, सलोखा आणि विकासाचा विचार पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे.

सभेच्या शेवटी त्यांनी भावनिक आवाहन करत म्हटले, “ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर आपल्या स्वाभिमानाची आहे. दबाव, धमकी आणि अहंकाराच्या राजकारणाला उत्तर देण्याची वेळ आली आहे. प्रभाग १७ चा सर्वांगीण विकास हवा असेल, तर मनिषा आरसूळ, भाऊसाहेब भोईर, शोभाताई वाल्हेकर आणि शेखर चिंचवडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. आपल्या एका मताने पिंपरी-चिंचवडचे भविष्य ठरवा!”

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version