पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक १२ मध्ये शांताराम भालेकर यांच्या प्रचारफेरीने संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापवले आहे. गल्लीबोळांतून, सोसायट्यांमधून काढण्यात आलेल्या या प्रचारफेरीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत “प्रभागात एकच नारा – नाद घुमू दे” असा जयघोष केला. प्रचारफेरी केवळ औपचारिक न राहता जनतेचा विश्वास आणि पाठिंबा दर्शवणारी ठरली.
या फेरीदरम्यान महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शांताराम भालेकर यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागातील प्रलंबित प्रश्न जाणून घेतले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि मूलभूत विकासकामांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली.
“फक्त आश्वासनांची राजकारणं नको, तर काम करणारा आणि जनतेत राहणारा प्रतिनिधी हवा,” अशी स्पष्ट भावना नागरिकांनी व्यक्त केली. शांताराम भालेकर यांनीही विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक कारभाराला प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रभागाचा आवाज थेट सभागृहात पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रचारफेरीतून प्रभाग १२ मध्ये भालेकर यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र झाली असून, विरोधकांवर दबाव वाढल्याचे चित्र दिसत आहे. वाढता जनसमर्थन आणि नागरिकांचा उत्साह पाहता, प्रभाग १२ मध्ये “भालेकरांचा नाद” आता निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
