Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे युवा व आक्रमक नेतृत्व चेतन पवार यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्ज भरण्यामुळे प्रभाग २५ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण तर विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
अर्ज दाखल करताना चेतन पवार यांच्यासोबत शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी, स्थानिक शिवसैनिक, युवक, महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “शिवसेना म्हणजे जनतेचा आवाज” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी ‘विकास, पारदर्शकता आणि स्थानिक नागरिकांचे प्रश्न’ हेच आपले प्रमुख अजेंडे असल्याचे चेतन पवार यांनी ठामपणे सांगितले.

चेतन पवार यांनी यावेळी विरोधकांवरही जोरदार टीका करताना सांगितले की,
“प्रभाग २५ मध्ये फक्त आश्वासनांची राजकारणं झाली. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं गेलं. आता ही लढाई सत्तेसाठी नाही, तर सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी आहे. शिवसेना उबाठा गट प्रभागाचा खऱ्या अर्थाने विकास करून दाखवेल.”
स्थानिक नागरी समस्या – रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी – यावर ठोस काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे चेतन पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांच्या कामाची दखल नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी ही केवळ पक्षाची नाही, तर जनतेच्या विश्वासाची उमेदवारी मानली जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, चेतन पवार यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग २५ मधील लढत अधिक रंगतदार आणि चुरशीची होणार आहे. शिवसेना (उबाठा) गटाने येथे पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्याचा स्पष्ट संदेश दिला असून येणाऱ्या काळात प्रचारात आणखी आक्रमक भूमिका पाहायला मिळणार आहे.

एकंदरीत, चेतन पवार यांच्या उमेदवारी अर्जाने प्रभाग २५ मध्ये राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून ‘शिवसेना उबाठा’ गटाने विजयासाठी कंबर कसल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version