Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाची आणि राज्याची कामगार शक्ती, श्रमशक्ती यांचे योगदान मोठे आहे, देशभरातील कामगार संघटना आणि कामगारांनी लढून संघर्षातून निर्माण केलेले ४४ कायदे रद्द करून कामगारांना देशोधडीला लावणारे ४ श्रम संहिता रद्द करा. सरकार भांडवलदारांना प्रोत्साहन देत असून भांडवलदार सोनेरी घडीला कामगार देशोधडीला अशी स्थिती असल्याची टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे आज थरमॅक्स चौक चिंचवड येथे तीव्र आंदोलन दरम्यान केली.

शेतकरी, कामगार यांच्यासाठी लढणारे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी आज कष्टकरी कामगारांनी महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलनात सुरुवात केली.

कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात झालेल्या “कामगार अस्तित्व आंदोलनात” प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने,निमंत्रक सचिन नागणे,महानगरपालिका सदस्य किसन भोसले, किरण साडेकर, प्रदेश तुषार घाटोळे, महिलाध्यक्षा रुक्मिणी जाधव, सचिन भोसले, लाला राठोड, शमशुद्दीन शेख, सखाराम केदार, रोहन मुरगुंड, विशाल कसबे शहनाज शेख,गीता माने,कांचन चव्हाण,बेबी राजगुरू,सुनिता भैरमडग,
मोनिका पटेल,मंगला म्हैसणे,गजानन मांडे आदिसह पुणे जिल्ह्यातील कामगार या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी झाले होते.

हम सब – एक है!, कामगारांचे अस्तित्व नष्ट करणाऱ्या ४ श्रम संहिता रद्द करा, कामगारावरील जुलमी कायदे रद्द करा ! स्थिर नोकऱ्या नाकारणारे कायदे रद्द करा ! कंत्राटीकरण वाढवणारे कायदे रद्द करा! अशा वेगवेगळ्या मागण्यांच्या घोषणा देऊन कामगारांनी आपला आवाज बुलंद केला.

यावेळी नखाते म्हणाले की, केंद्र सरकार इज ऑफ डूइंग बिजनेस धोरण असून उद्योजकांना पायघड्या घालण्याचे काम चालू आहे, कामगाराचे कल्याण आम्ही करत असल्याची जाहिरात करण्यात येत आहे ;मात्र प्रत्यक्ष कायमस्वरूपी काम आणि नोकऱ्या ह्या संपणार आहेत. संघटनेचे अस्तित्व संपवण्याचा कार्यक्रम लावला असून आधी न्यायालय ठरवणारी संघटना आता व्यवस्थापनाचे लोक ठरवणार त्यामुळे कामगार गुलामगिरीकडे प्रक्रिया सुरू झाली आहे. कामाचे ८ तासावरून १२ तास करून कारखानदारांना मोकळीक देण्यात आली आहे, आता या पुढे कामगार न्यायालये नाही तर लवाद न्याय निवाडा करणार तर कसा न्याय मिळेल ? कामगाराचे मूलभूत अधिकार नष्ट करण्यात येत आहे सरकार आभासी मंडळे घोषित करते मात्र हाती काही येत नाही, असेही नखाते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, कष्टकरी कामगारांना सामाजिक सुरक्षा ही केवळ दिशाभूल दाखवण्यात आली असून प्रत्यक्षात काही लाभ होणार नाही, नियुक्तीपत्र देणे म्हणजे कायमस्वरूपी काम नसून त्यांना कधीही काढण्याचा सरकारने दिलेला अधिकार आहे. अशा भयानक परिस्थितीतून कामगार जात असताना पुढील कालावधीमध्ये महाराष्ट्र आणि देशातील कामगार क्रांती करून उठण्याची गरज आहे. मुंबई व दिल्ली येथे होणाऱ्या भविष्यातील आंदोलनात कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version