Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे लीडरशिप फॉर इक्विटी आणि रोबोटेक्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक रोबोटिक्स लॅबचे उदघाटन शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांच्या नवकल्पना आणि कौशल्य विकासासाठी ही रोबोटिक्स लॅब उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

यावेळी सायन्स पार्कचे संचालक प्रवीण तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खापरिया, लीडरशिप फॉर इक्विटीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर रेड्डी बानुरी, मुख्य कार्यपालन अधिकारी दामिनी माईणकर, रोबोटेक्स इंडियाच्या कार्यपालन प्रमुख मनीषा सावंत उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगाचा प्रत्यक्ष अनुभव देऊन त्यांची कौशल्ये वृद्धिंगत करण्यासाठी रोबोटिक्स लॅब उपयुक्त ठरणार आहे. ही लॅब केवळ तंत्रज्ञान शिकवणारी नसून, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणारी, समस्या सोडवणारी आणि भविष्यातील अर्थव्यवस्थेत आत्मविश्वासाने सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. या प्रयोगशाळेतून विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स व प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण मिळून नवकल्पना विकसित करणे शक्य होईल.’

दामिनी माईणकर यांनी सांगितले की, ‘लीडरशिप फॉर इक्विटीने काही दिवसांपूर्वीच सायन्स पार्कमध्ये कम्प्युटर सायन्स कोडिंग लॅब स्थापन केली असून, या माध्यमातून आसपासच्या शाळांतील विद्यार्थी ब्लॉक-कोडिंग शिकून विविध प्रकल्प व अ‍ॅनिमेशन तयार करत आहेत. आता रोबोटेक्स इंडियाच्या सहकार्याने सुरू झालेल्या रोबोटिक्स लॅबमुळे विद्यार्थ्यांना आणखी संधी उपलब्ध होणार आहेत. या लॅबच्या मदतीने विद्यार्थी रोबोटिक्स व प्रोग्रॅमिंग अधिक सखोलपणे शिकून नवकल्पनांना मूर्त रूप देऊ शकतील व आपला दृष्टिकोन अधिक व्यापक करू शकतील.’

मनीषा सावंत म्हणाल्या की, ‘या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना विविध रोबोटिक्स स्पर्धांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्योजकता चॅलेंज, लाईन फॉलोअर, मेझ सॉल्व्हर आणि गर्ल्स फायर फाईट यांसारख्या स्पर्धांमध्ये सहभागामुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक क्षमता वाढेल तसेच संघभावना, नेतृत्वगुण आणि समस्या सोडवण्याचे कौशल्यही विकसित होईल.’

या उपक्रमाचे सातत्य टिकवण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. निवडक शाळांतील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना लॅबमध्ये मार्गदर्शन करू शकतील. यामुळे कार्यशाळा संपल्यानंतरही शिक्षणाची प्रक्रिया सातत्याने सुरू राहील आणि दीर्घकालीन परिणाम साधता येतील, असे डॉ. श्रद्धा खापरिया यांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version