Spread the love

पिंपळे सौदागर,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. चॅलेंजर पब्लिक स्कूलसोबत सिटी इंटरनॅशनल स्कूलनेही रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या प्रसंगी शाळेचे संचालक संदीप काटे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याच्या अमूल्य वारशाची जपणूक करण्याचे, तिरंग्याचा सन्मान राखण्याचे आणि देशाच्या प्रगतीसाठी निष्ठेने कार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, तिरंगा केवळ एक ध्वज नसून तो आपल्या अस्मितेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेच्या उपसंचालिका सौ. अनिता काटे यांनीही आपल्या विस्तृत भाषणातून विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त, आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी प्रत्येक नागरिकाने देशाच्या विकासात स्वतःची भूमिका बजावली पाहिजे, असे सांगत विद्यार्थ्यांना समाजकार्यात सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

तसेच रॅलीत पिंपळे सौदागर येथील शत्रुघ्न काटे, संजय भिसे, मनोज ब्राह्मणकर तसेच सिटी इंटरनॅशनल स्कूलचे संचालक अरुण चाबुकस्वार यांनीही सहभाग घेतला. रॅलीचे आयोजन हे शाळेच्या शिक्षिका दीपमाला चौधरी व सीमा सरदेसाई यांनी केले.

रॅलीतून परिसरात देशभक्तीचा उत्साह आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version