पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भोसरी येथील इंद्रायणीनगर प्राथमिक शाळेत देशप्रेम, सर्जनशीलता आणि पर्यावरणपूरकता यांचा सुंदर संगम घडवणारा आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी लेह लडाखमधील आपल्या वीर जवानांसाठी स्वतः हाताने राख्या तयार करून पाठवल्या आहेत.
हा उपक्रम आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, प्रशासनाधिकारी संगीता बांगर यांच्या संकल्पनेतून व शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे.
उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि माजी मुख्याध्यापिका शैला मातेरे यांचा विशेष सहभाग आहे. मातेरे या पर्यटक म्हणून लेह-लडाखला जाणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाल्यावर त्यांनी सैनिकांसाठी राख्या तयार करण्याचा निर्णय घेतला. यासाठी विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊतून टिकाऊ’ या संकल्पनेनुसार घरातील व शाळेत उपलब्ध असलेल्या टाकाऊ वस्तूंचा वापर केला. कागद, फिती, मोती, दोरे, जुनी सजावटीची साहित्ये अशा विविध वस्तूंमधून रंगीबेरंगी आणि आकर्षक राख्या तयार केल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या हस्तकला, नवनिर्मिती आणि पुनर्वापर कौशल्याला चालना मिळाली आहे .प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या लहानशा योगदानातून देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना भावनिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. सीमेवरचे जवान हेच आमचे खरे रक्षक आहेत, अशी भावना विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली.
