Spread the love

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आळंदी येथुन वाहणा-या इंद्रायणी नदीचे पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रात होत असलेल्या जोरदार संततधारेच्या पावसाने अलंकापुरीत इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचे पाण्यामुळे इंद्रायणी नदीने काठ सोडला आहे. पुराचे पाणी दुतर्फा पसरले असून नदी काठाचे रस्ते रहदारीला बंद झाले आहेत. या महापुराचे पाणी शनी मारुती मंदिर परिसर , राम घाट, भक्त पुंडलिक मंदिर, स्वामी महाराज मठ मागील चौंडी घाट परिसरात घुसले आहे. यामुळे नदी घाटावर अनेक ठिकाणी रहदारी बंद झाली आहे.

पुराचे पाणी पाहण्यास नदी घाटावर तसेच पुलांचे वर दुतर्फा भाविकांसह नागरिकांनी गर्दी करुन पुराचे पाणी पाहत सेल्फी चा आनंद लुटत आहेत. दक्षता म्हणून पुलांवर जास्त वेळ उभे राहू दिले जात नाही. इंद्रायणी नदी घाटाचा परिसर, भक्त पुंडलिक मंदिरात पाणी शिरले असून श्रींचे दर्शन बंद झाले आहे. इंद्रायणी नदी वरील घाटा लगतचे महात्मा गांधी यांचे रक्षा विसर्जन स्थळ स्मारकास पाण्याने वेढले आहे. भक्ती सोपान पुलावर पाणी लागले असून येथील दोन के. टी बंधारा पर्यंत पाणी आलेले आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास येथे साचून राहिलेली अडकलेली उर्वरित जलपर्णी पाण्यात वाहून जाण्यास मदत होणार आहे.

नदी घाटावरील अनेक संत, महाराज यांचे समाधी जवळ पाणी आले आहे. नदीचे दुतर्फा रस्ते रहदारीला धोकादायक असल्याने नागरिकांनी, भाविकांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे. अग्निशमन विभाग, आपत्ति व्यवस्थापन कक्ष कार्यरत करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. आळंदी नगरपरिषदेने नदीचे दुतर्फ़ा कर्मचारी तैनात केले असून जीवित हानी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. जीव रक्षक तैनात असून खडा पहारा ठेवला आहे. आळंदी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागासह आपत्ती व्यवस्थापन कक्षातुन नदी घाटावर नजर ठेवण्यात येत आहे. आळंदी नदीच्या दुतर्फा रस्ते धोकादायक असल्याने रहदारीस पर्यायी रस्ते वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version