Spread the love

 

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असून, ही कारवाई धाडसी आणि ऐतिहासिक ठरली आहे, अशी ठाम भूमिका भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराने दाखवलेले धैर्य आणि कौशल्य देशासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

“पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर भारताने शांततेच्या मार्गावर न चालता ठोस आणि थेट कारवाई केली. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे फक्त लष्करी अभियान नव्हते, तर भारताच्या स्वाभिमानाचे ज्वलंत उत्तर होते,” असे आमदार जगताप म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना ते पुढे म्हणाले, “दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला या कारवाईमुळे स्पष्ट संदेश गेला आहे. आता भारताच्या संयमाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न करणे त्यांना अतिशय महागात पडेल.”

भारतीय लष्कराच्या पराक्रमाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, “आपले जवान जेव्हा अशा मोहिमांमध्ये सहभागी होतात, तेव्हा ते केवळ देशासाठी लढत नाहीत, तर प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी रणभूमीत उतरतात. त्यांचे शौर्य, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठा याबद्दल संपूर्ण देशाला अभिमान आहे.”

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा अधिक भक्कम झाल्याचेही त्यांनी नमूद केले. “दहशतवादाला मूठमाती देणाऱ्या या कारवाईमुळे भारताने जगाला दाखवून दिले की, आता देशाच्या सीमांवर कोणत्याही प्रकारची कुरबूर सहन केली जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी सरकार आणि सैन्याचे अभिनंदन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version