Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तुम्ही जसे निसर्गाला द्याल तसे फळ तुम्हाला निसर्ग देतो. सध्या पर्यावरणाशी संबंधित अनेक बदल होत असल्याचे दिसून येते. स्वच्छ, सुंदर पर्यावरणासाठी झाडे लावून ती जगवली पाहिजेत; तरच आपण जीवन चांगले जगू शकतो. आपली भावी पिढी सुदृढ, निरोगी राहू शकेल. त्यामुळे पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्ती रक्षणाचे कार्य करण्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे मत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या पुणे विभागाचे प्रमुख ले. कर्नल विनीत नारायण यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयु) केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या वतीने पीसीयु वसुंधरा वृक्षारोपण मोहीम आणि हरित तंत्रज्ञान या विषयावर शुक्रवारी (२८ मार्च) चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी ले. कर्नल नारायण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सीए अमृता कुलकर्णी, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुचे प्र- कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. अमित पाटील, संगणक विभागप्रमुख डॉ. कमलेश मेश्राम आदी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी जपत देशाचे भावी नागरिक घडविण्याचे कार्य पीसीईटी शैक्षणिक संकुलात व्दारे केले जाते आहे. विविध विद्याशाखां मधून वीस हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असून एक हजारांपेक्षा अधिक शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. पीसीईटी शाश्वत विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. पर्यावरण रक्षण आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने पीसीयु वसुंधरा वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला आहे. यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.

एखादा प्रकल्प उभा करताना गुंतवणूकदार निसर्गाचे रक्षण, माणसांचे जीवन आणि नंतर नफा मिळविणे असा बदल गेल्या काही वर्षांत पहायला मिळत आहे. पर्यावरण संरक्षणासाठी हे चांगले संकेत आहेत. विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात प्रकल्प उभे करताना या बाबींचा विचार केला पाहिजे, असे सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या.

यानंतर झालेल्या चर्चासत्र अभिजित बेंद्रे यांनी ग्रामीण विकासासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, विद्याधर कुलकर्णी यांनी सेंद्रिय शेती तर अमोल साळगावकर यांनी मत्स्यपालन उत्पादक शेतकरी योजना या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी विविध विद्याशाखेचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

प्रास्ताविक डॉ. सुदीप थेपडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सायली कारंडे व प्रा. अभिजिता पुहान यांनी केले. डॉ. अमित पाटील यांनी आभार मानले.

पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, पीसीयू व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version