Spread the love

माजी नौदल अधिकारी सुदीर चौहान यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या प्रेरणेतून, उपाध्यक्षा सुषमा एस. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एव्हीपी स्नेहल नवलखा यांच्या सहकार्याने सूर्यदत्त नॅशनल स्कूल, बावधन येथे कारगिल विजय दिन सप्ताह देशभक्ती, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय सैन्याच्या अद्वितीय पराक्रमाला मानवंदना अर्पण करत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि सैनिकांविषयी आदरभाव जागृत करण्याच्या उद्देशाने हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला.

भारतीय जवानांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण आठवडाभर विविध देशभक्तिपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातील प्रमुख उपक्रम म्हणून विशेष प्रार्थना सभा आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या विशेष कार्यक्रमासाठी भारतीय नौदलातील माजी स्टोअर पेटी ऑफिसर (SPO) श्री. सुदीर चौहान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी तब्बल १५ वर्षे भारतीय नौदलात उल्लेखनीय सेवा बजावत देशसेवा केली आहे.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक, हेड बॉय आणि हेड गर्ल यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक म्हणून रोप भेट देऊन केली. त्यानंतर कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिनाचे महत्त्व, १९९९ च्या कारगिल युद्धातील भारतीय सैन्याचे अद्वितीय शौर्य आणि सर्वोच्च बलिदान याविषयी माहिती सादर केली. त्यानंतर प्रमुख पाहुणे श्री. सुदीर चौहान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या सैन्य सेवेतले अनुभव सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, शिस्त, धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि निःस्वार्थ देशसेवा या मूल्यांचा अंगीकार करण्याचे प्रेरणादायी आवाहन केले.

देशासाठी दिलेल्या त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल शाळेच्या वतीने श्री. चौहान यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांशी संवाद साधत समूह छायाचित्रे काढली.

कारगिल विजय दिन सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी विविध आंतरगृह स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली व दुसरीसाठी रंगभरण स्पर्धा, तिसरी ते पाचवी तसेच सहावी ते आठवीसाठी चित्रकला व निबंध स्पर्धा, तर नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आल्या.

पत्रलेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कारगिलच्या वीर जवानांप्रती कृतज्ञता, अभिमान आणि आदर व्यक्त करणारी हृदयस्पर्शी पत्रे लिहिली.या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यांच्या चित्रांमधून, निबंधांमधून आणि पत्रांमधून भारतीय सशस्त्र दलांविषयीचा आदर, राष्ट्रीय एकात्मता, धैर्य, कर्तव्यभावना आणि देशसेवेची प्रेरणा प्रभावीपणे व्यक्त झाली.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची जाणीव रुजविण्यावर सूर्यदत्तचा नेहमीच भर असल्याचे सांगितले. स्नेहल नवलखा यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या सैनिकांच्या त्यागाची जाणीव होत असून त्यांच्यात राष्ट्राविषयी अभिमान, जबाबदारी आणि कृतज्ञतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे नमूद केले.
“वीरांना सलाम… शौर्याला मानाचा मुजरा!” करत भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्य, त्याग आणि राष्ट्रसेवेचा सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये सन्मान करण्यात आला.

कारगिल विजय दिन सप्ताहानिमित्त आयोजित या विविध देशभक्तिपर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्याचा सन्मान आणि देशसेवेची प्रेरणा अधिक बळकट झाली. देशाच्या वीर जवानांना अभिवादन करत सूर्यदत्त नॅशनल स्कूलने पुन्हा एकदा मूल्याधिष्ठित, जबाबदार आणि राष्ट्राभिमानी नागरिक घडविण्याच्या आपल्या वचनबद्धतेची प्रचिती दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version