
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पीतांबरा बगलामुखी शक्ति पीठम, अहिल्यानगर यांच्या वतीने पूज्य श्री मयूरेश विसपुते गुरूजी यांच्या दिव्य सान्निध्यात दोन दिवशीय आध्यात्मिक अनुष्ठान अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात झाले. सुमारे १४ वर्षांनंतर गुरूजींच्या मार्गदर्शनात विशेष अनुष्ठान सोहळा साजरा झाला.
पीठमच्या साधक परिवाराने गुरु-परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरुमंडल पूजन विधी केला. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीने पावन आळंदी क्षेत्राचे आध्यात्मिक महत्त्व सांगताना गुरूजींनी नमूद केले की, हे क्षेत्र आजही चैतन्यमय असून प्रामाणिक साधकाला माऊलींच्या दिव्य उपस्थितीचा अनुभव प्राप्त होतोच . गुरु-तत्त्वाशी एकरूप होण्यासाठी श्रद्धा, साधना आणि समर्पण यांचे महत्त्व त्यांनी यावेळी साधकांना सांगितले.
श्री गणेश चतुर्थीच्या पावन मुहूर्तावर साधकांनी सामूहिक महागणपती तर्पण तसेच अत्यंत दुर्मिळ आणि गुप्त मानल्या जाणाऱ्या महागणपती पात्रसादन पूजनाचा विधी भक्ती, आनंद आणि उत्साहपूर्ण वातावरणात केले. श्री पीतांबरा बगलामुखी शक्ति पीठमचे पीठाधीश मयूरेश विसपुते गुरूजी हे श्रीविद्या, दशमहाविद्या, तंत्रसाधना आणि सनातन वैदिक परंपरेच्या जतन, प्रचार व प्रसारासाठी कार्यरत आहेत. आदिशक्ती श्री भुवनेश्वरीच्या महिम्याचा प्रसार, पात्र साधकांना श्रीविद्या व दशमहाविद्या साधनेचा मार्ग उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक साधकाने स्वतःच्या अंतर्मनातील दैवी चैतन्याचा अनुभव घ्यावा, त्याचे जीवनच साधना, सेवा आणि ईश्वरानुभूतीचे केंद्र बनावे सांगितले. या ध्येयातून उभे राहत असलेले श्री पीतांबरा बगलामुखी शक्ति पीठम, अहिल्यानगर हे साधना, संस्कार आणि आत्मबोधाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून विकसित होत आहे.
गेली अकरा वर्षे श्री पीतांबरा बगलामुखी शक्ति पीठमतर्फे श्री कालभैरव जयंती महोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. या महोत्सवाचे बारावे वर्ष असून, पूज्य श्री मयूरेश विसपुते गुरूजी यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान १०८ कुंडीय श्री भैरव चंडी महायज्ञासह विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वणीचा लाभ घेण्याचे आवाहन गुरुजींनी केले.
