
मीटर प्रमाणे भाडे आकारण्याचे रिक्षा चालकांना डॉ बाबा कांबळे यांचे आवाहन
जास्त भाडे सांगू नका भाडे नाकारू नका, असेही केले आवाहन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड
खटवा समितीच्या शिफारशीनुसार आणि सूत्रानुसार ऑटो रिक्षाच्या भाड्यात करण्यात आलेल्या नवीन भाडेवाढीचे ‘महाराष्ट्र रिक्षा पंचायत’ च्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले आहे. वाढती महागाई, गॅसचे सतत वाढलेले दर, स्पेअर पार्टचे वाढलेले भाव आणि महागाई निर्देशांक विचारात घेऊन ही सुधारित भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.
या नवीन सूत्रानुसार आता पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३० रुपये (पूर्वी २५ रुपये होती) आणि त्यानंतर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २० रुपये (पूर्वी १७ रुपये होती) असे सुधारित भाडे असणार आहे. प्रति किलोमीटर मागे ३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
देशात प्रथमच महाराष्ट्रात हकीम आणि ‘खटवा समिती’ची स्थापना – डॉ. बाबा कांबळे यांचा ऐतिहासिक लढा
या प्रसंगी बोलताना महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष तथा गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले की, “पूर्वी ऑटो रिक्षाची भाडेवाढ करण्यासाठी रिक्षा चालकांना वर्षानुवर्षे मोठा संघर्ष करावा लागत होता. परंतु, आमच्या अथक परिश्रमांमुळे आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे देशात पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये ‘हकीम समिती’ आणि त्यानंतर ‘खटवा समिती’ स्थापन करण्यासाठी आम्ही सरकारला भाग पाडले. आता संघर्षाची गरज उरलेली नाही, तर ठरलेल्या धोरण आणि सूत्रानुसार स्वयंचलित पद्धतीने भाडेवाढ होत आहे. ही कष्टकरी रिक्षा चालकांच्या दिर्घकालीन लढ्याची मोठी यशस्वी पावती आहे.”
रिक्षा चालक-मालकांना शिस्तीचे आवाहन
भाडेवाढ जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी सर्व रिक्षा चालक आणि मालकांना अत्यंत मोलाचे आवाहन केले आहे:
> “आता सर्व रिक्षा चालक-मालकांनी कोणत्याही वादात न पडता फक्त मीटरनेच व्यवसाय करावा, रिक्षा मीटरनेच चालवावी, प्रवाशांकडे जास्त भाडे मागू नये आणि कोणत्याही प्रवाशाला भाडे नाकारू नये. नवीन भाडेवाढीचा लाभ घेत असताना ग्राहकांशी व प्रवाशांशी उत्तम व आदराची वागणूक ठेवावी, जेणेकरून रिक्षा चालकांची प्रतिमा अधिक उजळून निघेल.”
या धोरणात्मक भाडेवाढीमुळे राज्यातील लाखो ऑटो रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला असून, महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे समाधान व्यक्त केले आहे.
