Spread the love

प्रकाश जाधव लिखित पुस्तक वाचनीय आणि संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जीवनावर आधारित प्रकाश जाधव लिखित ‘अजित पर्व’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

शनिवारी, (दि. २४ जुलै) गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात लेखक प्रकाश जाधव, कृषी मंत्री दत्तामामा भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, हार्ट पब्लिकेशन, पुणेचे प्रकाशक विनोद शिंदे, ॲड. लक्ष्मण रानवडे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे, वसंतराव पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे, किरण खोत, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक आदी उपस्थित होते.
‘अजित पर्व’ हे पुस्तक एका वेगळ्या संकल्पनेवर आधारित आहे. या चरित्र ग्रंथाची सुरुवात अजित पवार यांच्या आयुष्यातील अखेरच्या दिवसापासून होते आणि त्यानंतर त्यांच्या जीवन प्रवासाचा मागोवा घेत घेत वाचकांना त्यांच्या बालपण पर्यंत घेऊन जाते. पुस्तकात अजित पवार यांचे राजकीय यश, त्यांची प्रशासकीय कार्यपद्धती, वेळेचे काटेकोर नियोजन, विकासाभिमुख दृष्टी, निर्णयक्षमता, स्पष्टवक्तेपणा, काका पुतण्याच्या नात्यातील गुंतागुंत, त्यांच्याभोवती निर्माण झालेले गैरसमज आणि त्यामागील वास्तव यांचा वस्तुनिष्ठ अभ्यास करण्यात आला आहे.
लेखकाने भावनेपेक्षा संशोधन, पुरावे, विविध मुलाखती आणि दस्तावेजांच्या आधारे हे लेखन केले आहे. यातून अजित पवार यांचे वास्तववादी चरित्र म्हणून उभे राहते. अखेरचा क्लिअरन्स, प्रशासकीय हुकूमत, शिल्पकार आधुनिक शहरांचा, अधुरी कहाणी : एक राजकीय संघर्ष, शिस्तबद्ध अकादमी, जनतेचा दादा, अंत व अनंत आणि शेवटी ‘उगम व जडणघडण’ अशा आठ प्रकरणांतून अजित पवार यांचा जीवनपट उलगडत जातो. ही मांडणीच या पुस्तकाला इतर चरित्र ग्रंथापेक्षा वेगळी ओळख निर्माण करून देते, त्यामुळे हे पुस्तक वाचनीय आणि संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरेल असे प्रकाश जाधव यांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version