Spread the love

कीर्तन जयघोषात आळंदी येथे राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी च्या वतीने राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

आळंदी येथे घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता हा कार्यक्रम झाला. यावर्षी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर महाराज यांची कीर्तन सेवा रुजू झाली. “गांधीजी आणि वारकरी संप्रदायाचा एकमेकांवर प्रभाव होता आणि आहे. संत तुकारामांच्या ओव्यांचे गांधीजींनी इंग्रजीत भाषांतर केले होते. तुकारामांचे विचार त्यांना प्रेरणादायी वाटत. देहू, आळंदी आणि पंढरपूर येथील मंदीरांमध्ये दलितांना प्रवेश मिळण्यासाठी गांधीजींच्या अनुयायांनी नेतृत्व केले, ” असे बंडगर महाराजांनी विविध उदाहरणे देवून उलगडून दाखवले. या कार्यक्रमाला आळंदी नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते, वारकरी बांधव, ग्रामस्थ, विद्यार्थी, युवक – युवती आणि राष्ट्रपित्याचा आदर करणारे नागरिक आवर्जून उपस्थित होते.

विश्वस्त अन्वर राजन यांनी अध्यक्षीय भाषण केले आणि बंडगर महाराजांचा सत्कार केला. कैलास केंद्रे (मुख्याधिकारी, आळंदी नगर पालिका) यांचे प्रतिनिधी शिवकुमार शिवशरण, संजय गिरमे , आदित्य घुंडरे, कस्तुरबा आदिवासी ज्ञानसेवा मंडळ अध्यक्ष देवराम घुंडरे पाटील, आळंदी जनहित फाउंडेशनचेकार्यध्यक्ष अर्जुन मेदनकर, स्थानिक व्यवस्थापन समिती आळंदी अध्यक्ष गणपतराव कुर्‍हाडे पाटील, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त डॉ. मच्छींद्र गोर्डे, भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे विश्वस्त डॉ. प्रवीण सप्तर्षी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव संदिप बर्वे, आळंदी कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, पांडुरंग तापकीर, अर्जुन काळे, साहेब आरु, दिनेश कुऱ्हाडे, नितीन चव्हाण यांचेसह विविध वारकरी संस्थांचे विद्यार्थी ,महिला, टाळकरी उपस्थित होत्या.

आळंदीत राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण हरिनाम गजरात
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर महात्माजींच्या इच्छेनुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यां प्रमाणे इंद्रायणी नदी मध्येही विसर्जन करण्यात आले. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीत १२ फेब्रुवारी १९४८ रोजी झाले. त्यांची स्मृती म्हणून इंद्रायणी काठी रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. गेले ७६ वर्ष ही परंपरा अखंड सुरु आहे. सुत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त सचिव संदिप बर्वे यांनी केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि आळंदी नगरपरिषदेतर्फे या कार्य्रक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version