Spread the love

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाचा जीवनगौरव सन्मान मिळाल्याने मी कृतार्थ झालो आहे. राळेगणसिद्धी हे गाव आदर्शगाव होण्यासाठी टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांचे फार मोठे योगदान आहे!’ अशी कृतज्ञतेची भावना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी आदर्शगाव राळेगणसिद्धी येथे (शनिवार, दिनांक २३ मे) व्यक्त केली.

पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने अण्णा हजारे यांना टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर यांच्या हस्ते पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मान स्वीकारल्यानंतर अण्णा हजारे बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत पाटोळे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारविजेते कवी सीताराम नरके (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार), कामगार कवी प्रभाकर वाघोले (पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांनी प्रास्तविक केले. यावेळी डॉ. संभाजी मलघे, अरुण गराडे, जयवंत भोसले, सुधीर कांबळे, रंजना वाघ, सुरेखा कांबळे, संतोष गाढवे, स्वाती भोसले आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कामगारभूषण राजेंद्र वाघ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार पुरुषोत्तम सदाफुले यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version