– प्रशासकीय कामात ई-ऑफिस, ‘एआय’ आणि ‘ब्लॉकचेन’चा प्रभावी वापर!
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी राज्य सरकारने राबविलेल्या ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात’ पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घवघवीत यश संपादन केले आहे. या मोहिमेत पुणे विभागात प्रथम, तर संपूर्ण राज्यात तृतीय क्रमांक पटकावत ‘पीएमआरडीए’ने आपल्या कार्यक्षमतेची मोहोर उमटवली आहे. मुंबईत आयोजित विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘पीएमआरडीए’चा गौरव करण्यात आला.
राज्य शासनाने जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. याअंतर्गत राज्यातील ९७ महामंडळे, प्राधिकरणे आणि शासकीय संस्थांचे कडक निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सात तांत्रिक घटकांचा विचार करण्यात आला होता. कार्यालयाचे अद्ययावत संकेतस्थळ, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफिस, डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट यांसह कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा प्रशासनात अंतर्भाव करण्यावर ‘पीएमआरडीए’ने भर दिला.
तत्कालीन महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला आणि त्यांच्या अधिकारीवर्गाने या सुधारणांची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत आज (दि. २८ मार्च) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पीएमआरडीएला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. डॉ. योगेश म्हसे यांनी हे प्रशस्तिपत्र स्वीकारले. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांना फायदा
या यशामुळे ‘पीएमआरडीए’च्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणि सुसूत्रता आली आहे. विशेषतः ‘एआय’ आणि ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानामुळे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा अधिक वेगवान आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध झाल्या आहेत. प्रशासकीय दिरंगाईला फाटा देऊन तंत्रज्ञानाद्वारे कामे सुलभ केल्याबद्दल ‘पीएमआरडीए’चे सर्वत्र कौतुक होत आहे.
