पीसीयू मध्ये “अनंतम २०२६” महोत्सवात तरुणाईचा जल्लोष
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तरुणाईच्या सर्जनशीलतेला आणि प्रतिभेला संधी मिळावी, यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये अनंतम सारखे सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात अशा सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व्यक्त होण्याची संधी मिळते. यातूनच नवीन नेतृत्व, नव संकल्पना आणि आत्मविश्वास विकसित होतो असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयू) “अनंतम २०२६” या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी, समन्वयक डॉ. अंजू बाला आणि पीसीयूचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उद्योजक व प्रमुख पाहुणे नरेंद्र लांडगे म्हणाले की, “अनंतम २०२६” सारख्या महोत्सवातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होईल. आपल्या शैक्षणिक प्रगती बरोबरच क्रीडा, कला, साहित्य, संस्कृती, सांस्कृतिक, समाजसेवा अशा उपक्रमात देखील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव होते, यातूनच देशाचा सुसंस्कृत नागरिक घडतो.
प्रमुख पाहुणे व अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच पिंपरी चिंचवड विद्यापीठ प्रेरणा देते. “अनंतम २०२६” या महोत्सवातील विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि सर्जनशीलता म्हणजे पिंपरी चिंचवड विद्यापीठ अशा तरुण प्रतिभावंत विद्यार्थ्यांना दिशा दाखवण्याचे आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काम करत आहे याची खात्री आहे.
या महोत्सवात रांगोळी व मंडल आर्ट स्पर्धा, ट्रेझर हंट, बँड परफॉर्मन्स, फॅशन शो, विविध सांस्कृतिक उपक्रम, इ गेमिंग स्पर्धा, कार्निवल गेम्स आणि डीजे नाईट विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विशेष आकर्षण लखनऊ येथील प्रतिभावंत गायक आणि गिटार वादक सुधांशू खरे यांनी आपले सादरीकरण केले. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ढोल ताशांच्या गजरात साजरी करण्यात आली. यावेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, नेतृत्व संघटन आणि स्वाभिमानी मूल्यांना अभिवादन केले.
समारोप सत्रात पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि उद्योजक नरेंद्र लांडगे यांच्या हस्ते स्मृतिचन्ह देऊन गौरविण्यात आले.
स्वागत, प्रास्ताविक डॉ. अंजू बाला यांनी केले.
—————————————
