Spread the love

 

​पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर गेल्या ३ वर्षे, १० महिने आणि २४ दिवसांपासून असलेली प्रशासकीय राजवट आज संपुष्टात आली आहे. नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या निवडीमुळे शहरात पुन्हा एकदा लोकाभिमुख कारभाराचे पर्व सुरू झाले असून, हे सभागृह शहराच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवेल, असा विश्वास सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी व्यक्त केला.

​पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करताना प्रशांत शितोळे बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न ( बापू) काटे, आमदार महेश दादा लांडगे, आमदार शंकरभाऊ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते.

​प्रशासकीय राजवटीचा अंत, पारदर्शक कारभाराची सुरुवात

​यावेळी बोलताना प्रशांत शितोळे म्हणाले की, “दीर्घकाळ प्रशासक राजवट असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ नव्हते. आज महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीमुळे सामान्यांच्या आवाजाला सभागृहात स्थान मिळाले आहे.

नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध, पारदर्शक व लोकाभिमुख ठेवतील. प्रत्येक सदस्याला, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, शहराच्या हितासाठी बोलण्याची समान संधी मिळेल याची आम्हाला खात्री आहे.”

​नियोजनबद्ध विकासाचा वारसा पुढे नेणार
​शहराच्या वैभवाचा उल्लेख करताना शितोळे पुढे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड हे केवळ लोकसंख्येने मोठे शहर नाही, तर नियोजनबद्ध विकास आणि शिस्तीमुळे देशात आदर्श ठरले आहे. भाजपाला नागरिकांच्या पाठिंब्याने जे मोठे यश मिळाले आहे, तो विश्वास हे सभागृह सार्थ ठरवेल. मेट्रो, पायाभूत सुविधा आणि आयटी क्षेत्रातील प्रगतीला आता अधिक गती दिली जाईल.”

​निवड प्रक्रिया संक्षिप्त:
महापौर पद:रवी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने, निवडणूक अधिकारी तथा सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सकाळी ११:२० वाजता त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

उपमहापौर पद: शर्मिला बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी अर्ज भरला होता, मात्र त्यांनी तो मागे घेतल्याने बाबर यांचीही बिनविरोध निवड झाली.

​” महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे नवीन सभागृह शहराच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल. सभागृहात मतभेद असू शकतात, पण मनभेद न ठेवता शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व एकत्र काम करू,” असेही प्रशांत शितोळे यांनी यावेळी नमूद केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version