पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 27 व्या महापौराची निवड शुक्रवार (दि. 6) होणार आहे. त्या दिवसापासून प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन, नगरसवेकांचा म्हणजे लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू होणार आहे. चार वर्षांंनंतर महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपणार आहे.
मुदतीमध्ये महापालिकेची निवडणूक न झाल्याने महापालिका 12 मार्च 2022 ला बरखास्त झाली. दुसऱ्या दिवसापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली. तब्बल 4 वर्षे प्रशासक महापालिकेचा संपूर्ण कारभार पाहत आहेत. तत्कालीन आयुक्त राजेश पाटील, शेखर सिंह व श्रावण हर्डीकर या तीन आयुक्तांनी प्रशासकीय राजवटीत काम पाहिले आहे. प्रशासकीय राजवटीत अनेक मोठ्या व खर्चिक विकासकामांना मान्यता देण्यात आली. त्यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच, मुळा नदी सुधार योजनेसाठी 200 कोटींचे म्युन्सिपल बॉण्डद्वारे आणि हरित सेतू प्रकल्पासाठी 200 कोटींच्या ग््राीन बॉण्डद्वारे कर्ज काढण्यात आले. अनेक खडलेल्या तसेच, प्रलंबित कामांना मान्यता देऊन गती देण्यात आली.
चार वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक 15 जानेवारीला झाली. त्यात भाजपाची सलग दुसऱ्यांदा सत्ता आली आहे. भाजपाचे 84 व अपक्ष 1 असे एकूण 85 नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी काँग््रेासचे (अजित पवार) 37 आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) 6 नगरसेवक आहेत. सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे शुक्रवार (दि. 6) सकाळी अकराला होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत महापौर म्हणून विराजमान होणार आहेत.
रवी लांडगे हे महापालिकेचे 27 वे महापौर ठरणार आहेत. तसेच, भाजपाच्या शर्मिला बाबर यांच्या नावावर उपमहापौर पदाचे शिक्कामोर्तब होणार आहे. तेव्हापासून महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपणार आहे. महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांमार्फत महापालिकेचा कारभार सुरू होणार आहे. दरम्यान, महापौर व उपमहापौर दालनाची स्वच्छता करून आवश्यक दुरुस्ती कामे करण्यात येत आहेत. टेबल, खुर्च्या, सोफा तसेच, ॲण्टी चेंबर स्वच्छ करून घेण्यात येत आहे.
अनेक महापौर पुढे जाऊन झाले आमदार
भोसरी येथील ज्ञानेश्वर लांडगे हे महापालिकेचे पहिले महापौर झाले होते. त्यांनी 27 मार्च 1986 ते 19 मार्च 1987 असे वर्षभर महापौरपद भूषवले. त्यानंतर भिकू वाघेरे पाटील, नानासाहेब शितोळे, तात्या कदम, कविचंद भाट, सादबा काटे, प्रभाकर साठे, आझम पानसरे, विलास लांडे, रंगनाथ फुगे, संजोग वाघेरे पाटील, आर. एस. कुमार, अनिता फरांदे, हनुमंत भोसले, मधुकर पवळे, लक्ष्मण जगताप, प्रकाश रेवाळे, मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, योगेश बहल, मोहिनी लांडे, शकुंतला धराडे, नितीन काळजे, राहुल जाधव, उषा ढोरे यांनी महापौरपद भूषवले. उषा ढोरे यांनी 22 नोव्हेंबर 2019 ते 12 मार्च 2022 या कार्यकाळात महापौरपद भूषविले. महापौर झालेले विलास लांडे, लक्ष्मण जगताप हे दोघे आमदार झाले. आझम पानसरे व संजोग वाघेरे पाटील यांनी लोकसभेची तर, मंगला कदम, हनुमंत भोसले यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आहे.
