Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार हे साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही झोकून देऊन काम करायचे. हाच शिरस्ता ठेवून साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी सर्व स्तरातील संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, मंत्री, नेते यांनी सुट्टी न घेता काम करावे, तसा अध्यादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढावा. ही खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली ठरेल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.

याबाबत बोलताना राजेंद्र जगताप म्हणाले, की स्व. अजितदादा पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत संपूर्ण महाराष्ट्र आपल्या भोवती जोडून ठेवला तो केवळ आणि केवळ त्यांच्या काम करण्याच्या झपाट्याने, शिस्तीने आणि सर्वांगीण विकासाच्या प्रयत्नाने. ते सत्तेत असोत वा नसोत, महाराष्ट्र राज्य हे ‘विकासाचे आदर्श केंद्र म्हणून जगासमोर यावे’, हा त्यांचा ध्यास होता. त्यासाठी ते अविरत कष्ट घेत होते.

राजेंद्र जगताप एक आठवण सांगताना म्हणाले, की अजितदादांसोबतच्या माझ्या एका भेटीत त्यांच्यासमोर समाजोपयोगी उपक्रम सादर केला. दादांना तो पटल्याने त्यांनी “उद्याच तुम्ही संबंधित कागदपत्रे घेऊन मुंबईला या” असे सुचविले. परंतु, उद्या साप्ताहिक सुट्टी असल्याचे मी त्यांच्या निदर्शनास आणले. त्यावर दादा त्यांच्या शैलीत म्हणाले, “आयला, ह्या सुट्ट्या कशाला येतात कळत नाही. प्रगती थांबते ना महाराष्ट्राची एका दिवसाने”.
महाराष्ट्राच्या विकासाची तळमळ असणाऱ्या या युगपुरुषाला साप्ताहिक सुट्टीच्या एका दिवशी सर्व स्तरातील संस्था शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, मंत्री, नेते यांनी सुट्टी न घेता काम करावे, ही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. तसा अध्यादेश शासनाने काढावा, अशी विनंतीवजा मागणी राजेंद्र जगताप यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version