Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निवृत्तीवेतन ही केवळ आर्थिक तरतूद नसून सेवानिवृत्त व्यक्तींच्या दीर्घ सेवाभावाचा,त्यागाचा आणि योगदानाचा सन्मान आहे. निवृत्त वेतनधारकांनी एकमेकांच्या संपर्कात रहावे आणि संवाद ठेवावा असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका आणि पिंपरी चिंचवड सेवा निवृत्त सेवक परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय सेवानिवृत्त वेतनधारक दिन (पेन्शनर्स डे) निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले होते, यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

या कार्यक्रमास महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, पुणे जिल्हा कोषागार भवनाचे कोषागार अधिकारी देवराम शेळके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह हास्यसम्राट फेम ॲड.आनंद खेळकर, पिंपरी चिंचवड सेवानिवृत्त सेवक परिषदेचे अध्यक्ष प्रकाश जवळकर, शिवाजीराव तापकीर,चंद्रकांत झगडे, गणेश विपट,प्रकाश राऊळकर,सुरेश कुंभार, श्रीकांत मोने,प्रल्हाद गिरी गोसावी,श्रीराम परबत, मधू देसाई, डी.डी.फुगे,प्रमोद काशिकर,शहाजी माळी, कुमुदिनी घोडके,विजया जीवतोडे, यशवंत रासकर, मंगला नायडू यांच्यासह विविध शासकीय, निमशासकीय व अन्य क्षेत्रांतील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले, सेवानिवृत्तीनंतरही व्यक्ती सामाजिक बांधिलकीतून समाजाशी जोडलेली राहिली, तर विकासाला नवी दिशा मिळू शकते. सेवानिवृत्त व्यक्तींसाठी अशा उपक्रमांचे आयोजन केल्यामुळे खऱ्या अर्थाने सेवानिवृत्तांना सन्मान, आत्मविश्वास आणि समाजाशी आपले नाते दृढ असल्याची जाणीव होते, यामधूनच परस्पर संवाद, आपुलकीची भावना वृद्धिंगत होते, असेही त्यांनी सांगितले.

शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सेवानिवृत्तांकरीता पुणे जिल्ह्यातील कोषागार भवन अद्यावत करण्यात आले असून येथील अनेक वर्षांपासून जतन करून ठेवलेल्या पेन्शन पे ऑर्डर व कागदपत्रे त्वरीत उपलब्ध करून दिली जातात तसेच सेवानिवृत्तांसाठी तत्पर व विनम्र सेवा दिली जात असल्याचे प्रतिपादन कोषागार अधिकारी देवराम शेळके यांनी केले. विविध खात्यातील “सेवानिवृत्तांच्या अडीअडचणी व महाराष्ट्र शासनाचे पेन्शन विषयक धोरण” या विषयावर माहिती देताना ते बोलत होते.

व्यक्ती जेवढी मोठी व जबाबदार होत जाते तसं त्यांचे आनंदी रहाण्याचे व हसण्याचे प्रमाण ब-याचदा कमी होते यासाठी वय,परिस्थिती कशीही असली तरी सेवानिवृत्तांनी आपली विनोदबुद्धी जागृत ठेवावी, एकमेकांची विचारपूस करावी त्यामुळे मनावरील ताण व दु:ख कमी होते असे प्रतिपादन हास्यसम्राट ॲड.अनंत खेळकर यांनी केले.”सेवानिवृत्तींनंतरचे आनंदी जीवन” या विषयावर त्यांनी सेवानिवृत्तांशी समन्वय साधला.

निवृत्तीवेतनधारक दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सन्मान, विश्वास आणि आपुलकी देणारा ठरला. विविध क्षेत्रांतील सेवानिवृत्त कर्मचारी एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करत समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प या कार्यक्रमातून अधिक दृढ झाला.

शेकडो निवृत्तीवेतनधारकांनी घेतली १०० % मतदानाची शपथ.

“आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज,भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू” अशी शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली आणि लोकशाही बळकट करण्यासाठी १०० % मतदान करण्याचा निर्धारही केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश जवळकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी आणि आभार उपायुक्त अण्णा बोदडे यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version