Spread the love

 

पुणे : ‘सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर’ ही प्रार्थना जनमानसात रूढ करणारे, समता-न्या-बंधुतेचा जागर करणारे, घराेघरी संविधान पाेहाेचवण्याचा संकल्प केलेले, कष्टकऱ्यांचे नेते, सर्वांचे लाडके बाबा अर्थात डाॅ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (वय ९५) यांचे आज निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते.

गेल्या बारा दिवसापासून पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांना रुग्णालयात दाखल केले होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. त्यानंतर त्यांची किडनी फेल झाली. आज ८ वाजून २५ मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झालं. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

पुण्यात एका सामान्य कुटुंबात १ जून १९३० रोजी बाबांचा जन्म झाला. ते तीन महिन्यांचे असतानाच वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर आजाेळीच ते लहानाचे माेठे झाले. शाळेत असतानाच वयाच्या बाराव्या वर्षी अर्थात १९४२ मध्ये राष्ट्र सेवा दलात दाखल झाले. भाई वैद्य, पन्नालाल सुराणा आणि बापू काळदाते आणि बाबा यांनी एकत्र समाजकार्य केले. साने गुरुजी आणि एस. एम. जोशी हे त्यांचे मार्गदर्शक असल्याने, ते भारत छोडो चळवळ आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सक्रिय सहभागी होते. दलितांना पंढरपूर मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी १९४८ मध्ये झालेल्या आंदोलनात साने गुरुजी यांना बाबांनी मदत केली.

उच्च शिक्षणासाठी ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे वैद्यकीय व्यवसायासह सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभाग घेतला. महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या लेखन व कार्यांनी प्रेरित होऊन ते महाराष्ट्रातील संघटित आणि असंघटित कामगार चळवळीत सहभाग घेतला.

वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर नाना पेठेत स्वतःचे वैद्यकीय क्लिनिक सुरू केले, ही प्रॅक्टिस त्यांनी १४ वर्षे चालवली आणि नंतर त्यांचा सर्व वेळ आणि संसाधने सामाजिक कार्यासाठी समर्पित केली. दरम्यान, त्यांचे लग्न शीला गरुड यांच्याशी झाले. त्यांना पुढे दोन मुले झाली. बाबा आढाव यांनी अन्नधान्याच्या चढ्या किमतींविरोधात सत्याग्रह केला. यासाठी त्यांना तीन आठवडे तुरुंगवासही भोगावा लागला.

 

 

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version