Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘श्रीमद् भगवद्‌गीता पूजेपुरती न ठेवता जीवन मार्गदर्शक ग्रंथ म्हणून आचरणात आणा!’ असे आवाहन ब्रह्माकुमारी मैत्रेयी चैतन्य यांनी मनोहर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे केले.
चिन्मय मिशन, पिंपरी-चिंचवड आणि पुणे यांच्या वतीने आयोजित श्रीमद् भगवद्‌गीता (प्रकरण पंधरावे) पठण स्पर्धा २०२५ च्या पारितोषिक वितरण समारंभात ब्रह्माकुमारी मैत्रेयी चैतन्य बोलत होत्या. ह. भ. प. येवलेमहाराज, मिशनचे अध्यक्ष हेमंत गवंडे, सचिव आनंद देशमुख यांची व्यासपीठावर तर सहभागी शाळांमधील शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी अशी सुमारे १२०० हून अधिक व्यक्तींची समारंभात उपस्थिती होती. यावर्षीच्या स्पर्धेत ६८ शाळांमधील सुमारे ४००० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. या स्पर्धेची सुरुवात जुलै २०२५ मध्ये झाली व ती सुमारे तीन महिने चालली. प्राथमिक फेरीतून ८७८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांचे प्रतिनिधित्व करत अंतिम फेरीत सहभाग घेतला होता. ५० पेक्षा अधिक परीक्षक आणि २५ स्वयंसेवकांच्या समर्पित समूहाने अथक परिश्रमातून अंतिम विजेते निश्चित करण्यात आले. याशिवाय कार्यक्रमाचा एक विशेष भाग म्हणून शिक्षक आणि पालकांसाठी स्वतंत्र स्पर्धा घेण्यात आली. त्यात ७० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. विद्यार्थ्यांमधील सहा गटातील प्रथम क्रमांकाचे विद्यार्थी खालीलप्रमाणे :-
अ गट –
शिविका सिंह (सिटी प्राईड स्कूल, निगडी)
ब गट –
अद्विता पानवार (अमृता विद्यालयम्, निगडी)
क गट –
वेदान्त साळुंखे (गणेश इंटरनॅशनल,  चिखली)
ड गट –
आकांक्षा विश्वकर्मा  (डी वाय पाटील पब्लिक स्कूल, पिंपरी)
ई गट –
लावण्या बोबडे (डी वाय पाटील पब्लिक स्कूल, पिंपरी)
फ गट –
माधवी खांबे (डी आय सी इंग्लिश मीडियम स्कूल, निगडी)
विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली; तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उत्कृष्ट सहभागात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या ज्ञानप्रबोधिनी, निगडी शाळेतील शिवराज पिंपुडे यांना चषक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version