Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीतून यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार यांचे विचार संपवू दिले जाणार नाहीत. जनता आजही इथेच आहे. तिच्या हितासाठी संघर्ष करावा लागेल, आणि त्यासाठी रस्त्यावर उतरायलाही मागेपुढे पाहू नका,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षकार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पक्षाचे सरचिटणीस आमदार रोहित पवार, शहराध्यक्ष तुषार कामठे, ज्येष्ठ नेते प्रकाश म्हस्के, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिंदे यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, “लाडक्या बहिणीच्या योजनेत सरकारने अलीकडे निकष लावले असून, त्यामुळे ८० टक्के महिलांना लाभ मिळणार नाही. हे स्त्रीविरोधी धोरण असून सरकारने महिलांमध्ये नाराजी निर्माण केली आहे.”

ते पुढे म्हणाले, “राज्यात तीन इंजिनचे सरकार असून, कोण टॉवेलवर मारहाण करतो, कोण सिगारेट ओढतो आणि पैशांच्या बॅग घेऊन फिरतो. पोलिस विभागही हतबल झाला आहे.”

आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. “सरकारच्या विरोधात बोलले की ईडीसारख्या यंत्रणा कार्यरत होतात. पण अशा धमक्यांना न घाबरता काम करा, आंदोलन करा. लोकसभा-विधानसभा निवडणुकांमध्ये गटबाजी विसरून एकत्र लढा,” असा संदेश त्यांनी दिला. ते म्हणाले, “मंत्रिमंडळात मंत्री पत्त्यांचा खेळ खेळतात. शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती नाहीत, पण बँक खाते जोडण्याचे नियम मात्र माहीत आहेत.”

शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले, की विधानसभेला त्यांना पक्षात घेऊन तिकीट देऊन नका, असे सांगूनही त्यांना प्रवेश दिला गेला. ते आपले काम झाल्यानंतर पुन्हा त्या पक्षात गेले. महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत मोठा भ्रष्टाचार बोकाळला असून, भाजपच्या दोन आमदारांनी शहर अर्धे-अर्धे वाटून घेतले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version