Spread the love

उद्या पुणे पिंपरी चिंचवड आरटीओ ला देणार निवेदन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र सरकारने टू व्हीलर टॅक्सीला महाराष्ट्रामध्ये परवानगी दिली आहे. यापूर्वी पुणे शहरामध्ये टू व्हीलर बाइक टॅक्सी रॅपिडो या कंपनीने सुरू केली होती. त्यास पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक – मालकांनी प्राणपणाने तीव्र लढा दिला. ही रॅपिडो टू व्हीलर टॅक्सी पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये व महाराष्ट्रामध्ये बंद केले आहे. एकजुटीने टू व्हीलर टॅक्सी बाईक धोरण हाणून पाडू असे प्रतिपादन ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले. रिक्षा टॅक्सी चालक मालकांनी एकत्र येण्याचे आवाहनी बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

बाबा कांबळे म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयामध्ये नंतर दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयामध्ये याबद्दलची सुनावणी चालली. त्यामध्येही महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती, तसेच ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन यांनी सहभाग घेतला. सर्वोच्च न्यायालयांमध्ये देखील आम्ही लढाई जिंकलो. परंतु यानंतर मात्र महाराष्ट्र सरकारने झा समिती स्थापन केली. समितीने चुकीच्या पद्धतीने शिफारशी केल्या. त्या शिफारशीच्या आधारे महाराष्ट्रामध्ये टू व्हीलर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

लवकरच महाराष्ट्रातील सर्व संघटनांना सोबत घेऊ आणि “महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन (दिल्ली) यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्व संघटनांना सोबत घेऊन राज्यव्यापी व देशव्यापी आंदोलनाची तयारी देखील करणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले आहे.

२५ लाख बेरोजगार होणार –

टू व्हीलर टॅक्सी बाईकमुळे महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो चालक मालक तसेच पाच लाखापेक्षा अधिक टॅक्सी चालक-मालक बेरोजगार होणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. या अगोदरच आर्थिक अडचणीमध्ये असल्याने ऑटो आणि टॅक्सी चालक, यांच्या वरती आत्महत्या करण्याची वेळ येईल. कर्ज फेडणे, परिवाराची उपजीविका, मुलांचे शिक्षण असे अनेक प्रश्न उभे राहतील असे बाबा कांबळे म्हणाले.

आरटीओला निवेदन देणार –
उद्या 3 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता, पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालय येथे निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी रिक्षा टॅक्सी चालक मालकांनी एकत्र यायचे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे. दुपारी 2 वाजता पुणे आरटीओ येथे एकत्र जमून निषेध नोंदविण्यात येणार आहे.

शासनाच्या धोरणामुळे अनेक आर्थिक व सामाजिक प्रश्न उभे राहणार आहेत. या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. टू व्हीलर टॅक्सी विरोधामध्ये उद्या गुरुवारपासून (दि. ३) आंदोलनाची सुरुवात करत आहोत.

– बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत, आटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version