Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यामध्ये प्रदूषण कमी करण्यासह रोजगार उपलब्ध करण्याचे कारण पुढे करून महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला, १ लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई बाईक टॅक्सी सुरू होणार आहे. मात्र आधीच मोडकळीस आलेला रिक्षा चालकांचा व्यवसाय त्यांची असलेली कर्जे, आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षाचालकाना हक्क न देता ई बाईक टॅक्सीला परवानगी देणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायकारक आहे आणि भांडवलदारांचे कल्याण करणारा असल्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा महाराष्ट्रात यापुढेही तीव्र आंदोलन होईल असा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, कष्टकरी रिक्षा महासंघ, सारथी चालक-मालक महासंघ तर्फे आज घोषणा देत सरकारच्या निर्णयास विरोध करण्यात आला.

प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने,किशोर सरवदे,रोहन मुरगुंड,संजय भोसले, सचिन मुरगुंड, अविनाश मानवतकर ,महादेव गायकवाड,सलीम डांगे,शैलेंद्र चव्हाण ,बालाजी कदम,राजू बोऱ्हाडे, रामा बिराजदार, गुरू बदडाळे, राजाभाऊ होनमाने, दिनकर खांडेकर,रामभाऊ कांबळे, आनंद कदम आदीसह रिक्षाचालक उपस्थित होते.

नखाते म्हणाले की ई बाईक टॅक्सी बाबत यापूर्वीही सरकारकडे अनेक नकारात्मक अहवाल प्राप्त झालेले आहेत. सरकारने बंदीबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. ई बाइक टॅक्सीला परवानगी म्हणजे खाजगी कंपन्यांना पोहोचण्याचा प्रकार असून ५० किंवा त्यापेक्षा अधिक ई बाईक एकत्रित घेणाऱ्या संस्थेला याबाबत परवानगी दिली जाणार असून यामुळे भांडवलदाराचे कल्याण होणार असून रिक्षा चालकाचे नुकसान होणार आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये २५ लाखापेक्षा अधिक ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक आहेत त्यांच्या व्यवसायावर गदा आणणारा हा निर्णय असून रिक्षा चालकाने विरोध करू नये म्हणून रिक्षाचालकांच्या मुलाने किंवा मुलीने ई बाईक टॅक्सी घेतली तर त्याला १० हजार रुपयांच्या अनुदान अनुदान सरकार देणार उर्वरित रक्कम कर्ज रूपाने घ्यावी अशी दिशाभूल करून रिक्षा चालकांचा रोष आणि विरोध कमी करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मात्र रिक्षाचालकांचे महामंडळ अंमलात आलेच नाही त्याचबरोबर त्यांना मिळणारे लाभ याकडे सरकारचे पूर्णतः दुर्लक्ष झालेले असून आता ई बाईक टॅक्सीला परवानगी देऊन रिक्षा चालकांचा रोजगार हिरावून घेण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे सरकार करत असून याला आम्ही तीव्र विरोध करीत आहोत ज्या ठिकाणी रिक्षा चालकांचे व्यवसाय आहेत अशा मार्गावरती कसल्याही परिस्थितीत बाईक टॅक्सी जाऊ देणार नाही असा निश्चय रिक्षा चालकांचा आहे त्यामुळे सरकारने रिक्षाचालकांच्या मागण्यांना प्रथम प्राधान्य द्यावे अन्यथा महाराष्ट्रात मोठे आंदोलने होतील.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version