Spread the love

नवी दिल्ली/ पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हशा, व्यंग्य आणि उत्कृष्ट अभिनयाने परिपूर्ण अशी एक अविस्मरणीय संध्याकाळ मेघदूत ३ मध्ये अनुभवायला मिळाली, जेव्हा एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या थिएटर विभागाच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित २५ व्या भारत रंग महोत्सव (बीआरएम) मध्ये कंजूस चे सादरीकरण केले. हे नाटक प्रसिद्ध फ्रेंच नाटककार मोलिएर यांच्या क्लासिक विनोदी नाटक द मायझर च्या हिंदी रूपांतरावर आधारित असून, थिएटर विभागाचे प्रमुख डॉ. अमोल देशमुख यांच्या दिग्दर्शनाखाली सादर करण्यात आले. या प्रयोगाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.

मोलिएर यांचे द मायझर हे १७व्या शतकातील अजरामर व्यंग्यात्मक नाटक असून, कंजूस मध्ये त्याचे कौशल्यपूर्ण रूपांतर करण्यात आले आहे. या नाटकात मूळ हास्यशैली आणि वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्यात आली असून, भारतीय प्रेक्षकांसाठी ते सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समर्पक बनवण्यात आले आहे. हे नाटक मिर्झा शेख या पात्राभोवती फिरते, जो आपल्या संपत्तीच्या बाबतीत अतिशय कंजूस आणि हट्टी असतो. त्याच्या या स्वभावामुळे अनेक विनोदी गैरसमज आणि संघर्ष निर्माण होतात.

नाटकाच्या सुरुवातीपासूनच कंजूस प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तरुण कलाकारांनी आपल्या भूमिकांवर ठाम पकड घेतली आणि ती उर्जेने आणि नेमकेपणाने सादर केली. मुख्य भूमिका साकारणाऱ्या मिर्झा शेख यांनी अप्रतिम कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना हसवले. त्यांची शरीर भाषा, चेहऱ्यावरील भाव आणि हावभावांनी कंजूस माणसाच्या मानसिकतेला उत्कृष्ट प्रकारे साकारले.

मात्र, या संध्याकाळी खरी चमक दाखवणाली ती नंबू या पात्राने. एका महिला कलाकाराने साकारलेले हे पात्र आपल्या मिश्कील शैलीने, देहबोलीच्या अभिनयाने आणि प्रभावी संवादफेकीने प्रेक्षकांच्या मनात ठसले. त्यांच्या जिवंत अभिनयशैलीने, योग्य टायमिंगने आणि उत्तम रंगमंचीय उपस्थितीमुळे संपूर्ण नाटक अधिक प्रभावी झाले. मुख्य पात्रांव्यतिरिक्त संपूर्ण कास्टनेही अप्रतिम अभिनय सादर केला. प्रेमकथा, चतुर नोकर आणि मिर्झा शेखच्या भोवतालची पात्रे यांनी नाटकात हास्य आणि मनोरंजनाचा उत्कृष्ट मिलाफ साधला. कलाकारांमध्ये उत्तम समन्वय होता, त्यामुळे संवाद आणि दृश्ये सहज आणि स्वाभाविक वाटली.

एमआयटी एडीटी थिएटर विभागाचे मोठे यश
राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) तर्फे आयोजित भारत रंग महोत्सव हा भारतातील सर्वांत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आहे. यात कंजूस ची निवड होणे हे एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या थिएटर विभागासाठी एक मोठे यश आहे. हजारो नाटकांच्या कठोर निवड प्रक्रियेतून या नाटकाची निवड झाली, यामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि विभागाच्या सर्जनशील दृष्टिकोनाला मान्यता मिळाली. कंजूस हे केवळ एक मनोरंजक नाटक नसून, हे संस्थेच्या उदयोन्मुख नाट्यकलावंतांना पोषण देण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. बीआरएममध्ये मिळालेल्या उदंड प्रतिसादाने विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांच्या मार्गदर्शकांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हा यशस्वी प्रयोग या युवा कलाकारांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version