Spread the love

 

निर्धार मेळाव्यात भाऊसाहेब भोईर यांनी शहरातील सत्ताधाऱ्यांच्या कामकाजाची केली पोलखोल

अजित पवारांनी सरड्याचा डायनासोर केला

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी मोठ शक्ती प्रदर्शन करत आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केलं. त्याच बरोबर अजित पवारांनी सरड्याचे डायनासोर करत माझ्यासह अनेकांचा विश्वासघात केल्याचा थेट आरोपही केला.

ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी रहाटणी येथील थोपटे लॉन्स मध्ये आपली राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात मोठे शक्तिप्रदर्शन करत भोईरांनी पक्षाला राम राम करत उघडपणे आपल्या बंडखोरीला सुरुवात केली. त्याच वेळी त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार ही पक्का केल्याचे जाहीर केले. या मेळाव्याला भाऊसाहेब भोईर यांना पाठिंबा देण्यासाठी शहरातील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, विनोद नढे, अतुल शितोळे, ,प्रभाकर वाघेरे, गणेश लोंढे, संतोष कोकणे,हरिभाऊ तिकोने,राजेंद्र साळूंके, माऊली सूर्यवंशी, सतीश दरेकर हिंजवडीचे माजी सरपंच श्याम हुळवले, नाट्य परिषदेचे सुहास जोशी, किरण येवलेकर, बांधकाम व्यावसायिक सुजित पाटील, राजू जैन, तसेच मधुकर चिंचवडे यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करताना भोईर म्हणाले की, ज्यांनी या शहराची वाट लावली त्यांच्यासमोर मी लाचार होणार नाही. त्यापेक्षा मी जनतेसमोर नतमस्तक होईल. महापालिकेत सुरू असलेल्या लुटीला इथले नेते पाठीशी घालत आहेत. इथल्या कारभाऱ्यांनी नद्यांची गटार केल आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न हा जटील झालाय.

इतिहासात कोणी चुका केल्या, त्यावर वर्तमानात मात करता येत नाही. मात्र, त्या चुकांमुळे भविष्य उध्वस्त होतं. आणि ही चूक सुधारण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वांनी मला द्यावी असं आवाहनही भोईर यांनी आपल्या भाषणात केलं.

अण्णासाहेब मगर यांनी या शहराची स्थापना केली. मात्र, आज त्यांचाच या शहराला विसर पडलाय मी काय चुकलो हे मला कळत नाही. अस सांगत भोईर म्हणाले की, विद्यार्थी दशेपासून मी काम करत आलोय. पण केवळ मला भ्रष्टाचार करता येत नाही, स्वार्थी राजकारण करता येत नाही याच कारणानं मला वेळोवेळी डावलण्यात आलं.

राजकारण करण हा माझा धंदा नाहीये. या शहराने तुम्हाला मला ओळख दिली, अस्तित्व दिल, आर्थिक स्थैर्य दिले. आणि त्यामुळेच हे शहर विकासाच्या दृष्टीने प्रगतीपथावर नेणे हे माझं स्वप्न आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांची साथ आवश्यक आहे. आज जर बदल घडवला नाही, तर हे अजगर तुम्हाला गिळल्या शिवाय राहणार नाहीत, असेही भोईर आपल्या भाषणात म्हणालेत .

आज जनता माझी मालक आहे. शहरात जे काही सुरू आहे ते थांबवायला, त्यावर बोलायला नैतिकता लागते. ती माझ्याकडे आहे. पैशांची मस्ती इथल्या सत्ताधाऱ्यांना आलेली आहे. महापालिका लुटून खाणं हेच त्यांचं काम आहे. हे थांबवण्यासाठी मी ही लढाई लढतोय. क्रांती ही चिंचवड मधून होते. मोरयाची गोसावींची भक्ती आणि चाफेकरांची क्रांती ही माझ्या रक्तात आहे आणि त्यासाठी मला तुम्हा सर्वांची साथ हवी आहे असं भावनिक आवाहन भोईर यांनी आपल्या भाषणात केलं.

चौकट
तरच लक्ष्मण भाऊंच्या आत्म्याला शांती मिळेल

मी आमदार झाल्याशिवाय लक्ष्मण भाऊंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही असं भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या भाषणात सांगितलं. मी कधीच खोटं बोलत नाही. लक्ष्मण भाऊ मला म्हणाले होते भाऊसाहेब तुला डावलून चुक झाली. तुला आमदार करायला हवं होतं. त्यामुळे, त्यांच्या आत्म्याला जर शांती मिळावी असं वाटत असेल, तर मला सर्वांनी साथ द्यावी असेही भोईर आपल्या भाषणात म्हणाले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version