Spread the love

 

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -” स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग महत्वाचा होता. त्यांनी क्रांतीकारकांना विविध प्रकारे मदत करत स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग जागृत ठेवले. सावरकरांचे विचार, वकृत्व , लेखनी आणि विरश्रीपूर्ण काव्य यांच्या मधून क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली . म्हणून सावरकर हे क्रांतीकारकांचे मेरूमणी होते.” असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक अँड. अरविंद वाडकर यांनी केले.

शिवतेजनगर येथील शिवतेज मित्र मंडळाने गणेश जयंती निमित्त आयोजित केलेल्या शिवतेज व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प गुंफताना “स्वा. सावरकर यांचे स्वातंत्र्या साठी योगदान” या विषयावर ते बोलत होते.

सामाजिक कार्यकर्ते बालाजी कानवटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे , साहित्यिक राज अहेरराव, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब गंगावणे, बाबा भोजकर, विठ्ठल दळवे, प्रकाश सरोदे आदींची प्रमुख उपास्थिती होती.

वाडकर पुढे म्हणाले की, ” सावरकरांच्या प्रेरणादायी काव्यामधून आणि अमोघ वकृत्वामधून वीरश्री निर्माण होत असे. त्यांनी सदैव विज्ञानवादाचा पुरस्कार केला. विज्ञानाला देव माना, पाश्चिमात्य राष्ट्रांच्या प्रमाणे प्रगती करावायची असेल तर यंत्राचा अवलंब करा असे ते म्हणत. समाजामधील अंधश्रद्धा , जातिभेद नष्ट करण्यासाठी त्यांनी स्वतः समाज जागृती केली.
सावरकर हे जगाच्या इतिहासामधील एकमेव क्रांतिकारक आहेत, ज्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती. नवीन पिढीला सावरकरांचा त्याग समजणे आवश्यक आहे व त्यांच्या विचारांचे आकलन होणे गरजेचे आहे.” असे त्यांनी प्रतिपादन केले.

राजेंद्र घावटे यांनी व्याख्यानमालांचे समाजप्रबोधनातील महत्व विशद करत पिंपरी चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीच्या कार्याची माहिती दिली.
प्रास्ताविक मंडळाचे बाबा भोजकर यांनी केली.
सूत्रसंचालन बाळासाहेब गंगावणे केले.
दीपाली धानोकार, बशीर इनामदार यांनी संयोजन केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version