सामाजिक आर्थिक विषमतेच्या विरोधात देशव्यापी लढ्याचा निर्धार दिल्ली येथे दोन दिवसीय अधिवेशन संपन्न

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देश व राज्यभरामध्ये सामाजिक, आर्थिक,रोजगार , न्यायीक संधी यामध्ये प्रचंड विषमता पसरलेली असून ऑस्कोफॉमच्या अहवालानुसार देशभरातल्या केवळ दहा टक्के श्रीमंत लोकांकडे देशाच्या निम्म्याहून अधिक संपत्ती आहे उत्पन्न आणि संपत्ती मधील असमानतेमध्येही मोठी वाढ होत आहे. देशभरामध्ये शिक्षण, नोकरीची सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी असमानतेच्या विरोधात लढण्याचा निर्धार देशातील २२ राज्याच्या प्रतिनिधींनी आज दिल्ली येथे सर्वानुमते घेण्यात आला .
नवी दिल्ली येथील राजा राम मोहन राय मेमोरियल हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांना विशेष आमंत्रण देण्यात आले राष्ट्रीय संयोजक चंदन कुमार,तेलंगणाचे शेख सलाउद्दीन,पंजाबचे धरमवीर जोरा ,प.बंगालचे अजितेश पांडे,राजस्थानचे गोविंद लाल , कर्नाटकचे अभय कुमार यांच्यासह २२ राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले की रिक्षा, कारचालक, सफाई कामगार, बांधकाम मजूर, घरेलू कामगार, फेरीवाला ,कंत्राटी कामगार यांच्या श्रमातून देशाच्या निर्मितीत महत्त्वाचा वाटा आहे. मात्र या श्रमिक वर्गाची भांडवलदाराकडून पिळवणूक होत आहे, देशभरासह महाराष्ट्र राज्यात ही असमानता आणि भेदभाव फार मोठ्या प्रमाणात वाढलेला असून महिला -पुरुष श्रमिक कष्टकरी वर्गांना किमान आणि समान वेतनापासून ते आरोग्य, शिक्षण , रोजगार ,सामाजिक स्थितीत दररोज भेदभाव पाहायला मिळत आहे, ही विषमता नष्ट करण्यासाठी म्हणून सामूहिक प्रयत्नांची गरज आहे ती आजपासून पुन्हा जोमाने करू या असे आवाहन त्यांनी केले. प्रस्तावना दिल्लीचे निर्मल गोराणा यांनी केले तर आभार जीवन राठोड यांनी मानले चळवळीच्या गीताने समारोप करण्यात आला.













