Spread the love
पिंपरीत घर घर संविधान उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत नसणारे अनेक बदल काँग्रेसने संविधानात
केले होते; तसेच काँग्रेसनेच संविधान धोक्यात आणण्याचे काम केले!” असे परखड वक्तव्य राज्यसभेचे खासदार, उत्तर प्रदेशातील माजी पोलीस महासंचालक बृज लालजी यांनी केले. पिंपरी येथील मिलिंदनगर परिसरातील वाल्मीकी आश्रमात आयोजित ‘संविधानाचा सन्मान : ‘घर घर संविधान’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आणि अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष दिलीप कांबळे, धनराज बिर्दा, मनोज तोरडमल, माणिक पौळ, नाना कांबळे, गणेश कलवले, संजय धुतडमल, मुकुंद यदमल, बेहेनवाल, गोरक्ष लोखंडे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला महर्षी वाल्मीकी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसह संविधान उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले.
पुढे बोलताना बृज लालजी म्हणाले की, “बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात अधिक त्रास काँग्रेसने दिला. बाबासाहेबांचे सहकारी जोगेंद्रनाथ मंडल हे फाळणीच्या वेळी पाकिस्तानात गेले; परंतु तेथील हिंदूंवर होणारे अन्याय पाहून भारतात परत आले!”
याप्रसंगी संविधानाची महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेली प्रत देऊन उपस्थितांचा सन्मान करण्यात आला; तसेच ‘संविधानाचा सन्मान : घर घर संविधान’ या नियोजित उपक्रमाचा महाराष्ट्रात प्रारंभ करण्यात आला.
शाहीर आसराम कसबे यांनी लोकजागर गीत सादर केले. अरुण कराड यांनी सूत्रसंचालन केले. नरेंद्र टाक यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पिंपरी येथील वाल्मिकी आश्रमाचे अध्यक्ष, सचिव आणि विविध पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. संजय धुतडमल यांनी संविधान प्रती उपलब्ध करून दिल्या.
Share.
Leave A Reply

Exit mobile version